वाशीम : तब्बल १५ वर्षांपूर्वी घडलेल्या रिसोड पोलीस कोठडीतील बेग्या पवार मृत्यूप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत तत्कालीन पोलीस निरीक्षकासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राज्यातील कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांमध्ये एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही अभूतपूर्व घटना मानली जात आहे. हे प्रकरण ९ मे २०११ रोजीचे आहे.
Also Read : अहमदनगर: ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कोपरगावात कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!
चोरीच्या संशयावरून रिसोड पोलिसांनी पारधी समाजातील बेग्या पवार आणि राजू पवार या दोघांना हिंगोली जिल्ह्यातील वाढोणा येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आरोपानुसार, पोलीस कोठडीत दोघांनाही अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत बेग्या पवार यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर ४३ गंभीर दुखापती असल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला. (Begya Pawar Custodial Death)
सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सखोल तपासातून गोळा करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि ४७ साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदार माधव धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश सीताराम ताराम, नागोराव भगवानराव खंडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कनीराम जाधव या नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Also Read : पेपरफुटीविरोधात अहिल्यानगरमध्ये सम्यक विद्यार्थी संघटनेचे तीव्र आंदोलन; शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
सरकारी पक्षातर्फे ॲड. श्रीराम नारायणराव काळू यांनी प्रभावी युक्तिवाद करत बेग्या पवार यांना केवळ संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले होते आणि कोणत्याही व्यक्तीवर पोलीस कोठडीत अमानुष अत्याचार करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे न्यायालयासमोर ठामपणे मांडले. निकालानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. (Begya Pawar Custodial Death)
अशाच प्रकारे मागील दीड वर्षापूर्वी सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा पोलिस मारहाणीत कोठडीत मृत्यू झाला. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर न्यायालयीन लढा लढत आहेत. तर या प्रकरणातील दोषी पोलिसांवर देखील कडक कारवाई होणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुटी, अनेक रस्ते बंद
मुंबई : आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भाग जलमय...
Read moreDetails






