श्रीगोंदा : भटके-विमुक्त समाजाची अचूक घरगणना आणि जनगणना व्हावी, तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी प्रभावी धोरणे आखली जावीत, या उद्देशाने उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘मुशाफिरी यात्रा’चा समारोप सोमवारी (दि. २९ जून) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील भिल्ल वस्ती (धनगर वस्ती) येथे उत्साहात पार पडला.
या समारोप समारोहाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यात्रेदरम्यान भटके-विमुक्त समाजातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी माध्यमांशी सुजात आंबेडकर म्हणाले की, “भटके-विमुक्त समाजासमोरील प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचे असतील, तर महाराष्ट्राची सत्ता समाजाने स्वतःच्या हातात घ्यावी लागेल. सत्ता मिळविल्याशिवाय पर्याय नाही. प्रस्थापितांनी केवळ सत्ताधारी, उद्योगपती, कारखानदार किंवा जमीनदारांची मुलेच राजकारण करू शकतात, असा समज समाजात रुजवला आहे. हा समज मोडून भटके-विमुक्त समाजातील नेतृत्व सत्तेत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कार्यरत आहे.
ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत इंदापूरसह अनेक ठिकाणी भटके-विमुक्त समाजावर अन्याय-अत्याचार झाले. श्रीरामपूर येथे कबुतर चोरीच्या संशयावरून भटके-विमुक्त समाजातील तरुणांना तीन दिवस उलटे टांगून अमानुष मारहाण करण्यात आली. अशा घटना समाजाची वस्तुस्थिती दर्शवतात.
सुजात आंबेडकर यांनी सांगितले की, आज भटके-विमुक्त समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून, या समाजाचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत आहे. वंचित बहुजन आघाडी भटके-विमुक्त समाजातील उमेदवार तयार करून त्यांना सत्तेत पाठवण्याचे काम करत आहे. समाजातील प्रतिनिधीच समाजासाठी प्रभावीपणे लढू शकतो, हा आमचा विश्वास आहे.
यावेळी त्यांनी टीईटी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली. ते म्हणाले, टेलिग्राम बंद करून पेपरफुटी थांबणार नाही. पेपर तुमच्याच विभागातून फुटत असेल, तर ॲप बंद करण्यापेक्षा स्वतःच्या विभागाची चौकशी करा. टेलिग्राम बंद केला तर व्हॉट्सॲपवर पेपर जाईल, व्हॉट्सॲप बंद केला तर फेसबुकवर जाईल, तेही बंद केले तर इतर मार्गाने माहिती बाहेर येईल. त्यामुळे पेपरफुटी रोखण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा. ती करण्याची हिंमत नसेल, तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुजात आंबेडकर म्हणाले.





