मुंबई : महाराष्ट्रातील TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील अपयशावर सरकारला धारेवर धरले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ‘धर्म स्वातंत्र्य अधिनियम’ आणून धर्मांतरावर निर्बंध घालणे, ‘जन सुरक्षा विधेयकाच्या’ माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहमती आणि लोकशाही अधिकारांवर गदा आणणे, अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी असलेल्या निधीचा गैरवापर करणे, आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम रोखणे आणि बुद्ध विहारांवर कारवाई करणे या गोष्टींना सरकारने प्राधान्य दिले. मात्र, ‘डबल इंजिन सरकार’ असल्याचा दावा करणाऱ्या भाजपप्रणीत महाराष्ट्र सरकारला TET पेपरफुटी रोखण्यात अपयश आले आहे, अशी टीका त्यांनी केली.
Also Read : TET पेपरफुटी प्रकरण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – सुजात आंबेडकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्राधान्यक्रमांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच, “आता या घटनेसाठी सरकार पाकिस्तान, बांग्लादेश किंवा घुसखोरांना जबाबदार धरणार का?” असा उपरोधिक सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
सध्या TET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत आहे.






