औरंगाबाद : जानेफळ (ता. वैजापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने ग्रामपंचायत अधिकारी जानेफळ आणि गटविकास अधिकारी वैजापूर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जानेफळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी पंचायत समिती वैजापूर कार्यालयासमोर सखाराम शिनगारे, सिद्धार्थ बागुल तसेच काही वयोवृद्ध महिला १८ मेपासून आमरण उपोषण करत आहेत.
Also Read : Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!
वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने २४ जून २०२५ आणि १३ मे २०२६ रोजी गटविकास अधिकारी वैजापूर व ग्रामपंचायत अधिकारी जानेफळ यांच्याकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशी संबंधित गंभीर विषय असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला.
तसेच, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करत असून मागासवर्गीय समाजातील नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. उपोषणाला पाच दिवस उलटूनही अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
Also Read : चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी
या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी स्वतः लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या शिष्टमंडळात पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा संघटक राजन किर्तने, पूर्व शहराध्यक्ष मतीन पटेल, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे आणि युवा पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे आदींचा समावेश होता.






