या प्रकरणी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेणार – डॉ. राहुल ससाणे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनानंतर आंबेडकरी कार्यकर्ते तथा ‘विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती’चे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडत विद्यापीठ प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “भरती प्रक्रियेत पारदर्शकता मागणे आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणे हा गुन्हा आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
राहुल ससाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि प्राध्यापक भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला. विशेषतः विद्यापीठ प्रशासनाने ATR प्रक्रियेतून सुमारे सहा हजार पात्र दलित-बहुजन, शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गातील उमेदवारांना वगळल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात त्यांनी विविध माध्यमांमधून प्रश्न उपस्थित करत एटीआर प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तसेच महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी विद्यापीठ प्रशासनाने जाहीर प्रकटन काढून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे ससाणे यांनी सांगितले.
“सत्याचा आवाज उठवणे गुन्हा आहे का? हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मागणी करणे चुकीचे आहे का? विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही का?” असे सवाल उपस्थित करत विद्यापीठ प्रशासन हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याची टीका त्यांनी केली.
राहुल ससाणे यांनी आपल्या प्रकटनात म्हटले आहे की, विद्यापीठाने जाणीवपूर्वक त्यांचे नाव जाहीर प्रकटनात नमूद करून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. “मी MA, M.Phil, SET, NET-JRF, पत्रकारितेचा डिप्लोमा आणि PhD संशोधन करणारा विद्यार्थी असून, विद्यापीठ प्रशासनाच्या चुका आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
यासोबतच, जर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली नाही, तर विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, प्र-कुलगुरू आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राहुल ससाणे यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. एटीआर भरण्यासाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि माध्यमांमध्ये बोलल्याबद्दल दबाव टाकण्यासाठी काढलेले जाहीर प्रकटन तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“आंबेडकरी आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, शिक्षक, वकील, सिनेट सदस्य आणि सर्व सजग नागरिकांनी या प्रकरणात माझ्या बाजूने उभे राहावे,” असे आवाहनही राहुल ससाणे यांनी केले आहे.





