Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. AI च्या माध्यमातून तयार होणारे पोस्टर्स आणि बॅनर्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात असून, हा प्रकार चळवळीच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जगभरात बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी सुरू असताना AI निर्मित सामग्रीद्वारे त्यांच्या विचारांची मोडतोड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात काही ठिकाणी बाबासाहेबांच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रयत्न होत असून, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून बी. एन. राव यांचे नाव पुढे करून खोटा प्रचार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कडून बाबासाहेबांचे विचार समरसतावादी असल्याचा अजेंडा राबवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पूर्वी बाबासाहेबांना विरोध करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व तथाकथित पुरोगामी गटांकडूनही त्यांच्या विचारांचे चुकीचे प्रतिनिधित्व केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या पिढीतील आंबेडकरी तरुणांनी बाबासाहेबांचे मूळ लेखन, विशेषतः Writing and Speeches मधील विचार वाचण्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ओरिजिनल साहित्य बाजूला ठेवून AI निर्मित मजकूर आणि चित्रांचा प्रसार वाढत असल्याने हा प्रवाह थांबवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांचे हजारो मूळ फोटो उपलब्ध असताना AI तयार चित्रांचा अट्टहास करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रवृत्तीमुळे स्थानिक कलाकारांच्या कलेवर आणि उपजीविकेवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बाबासाहेबांचे खरे विचार आणि मूळ स्वरूप जपण्यासाठी सर्वांनी त्यांच्या ओरिजिनल फोटोंचाच वापर करावा आणि भीम जयंती उत्साहात साजरी करावी, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले आहे.





