यवतमाळ : जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा दिग्रस–दारव्हा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने दमदार पाऊल टाकत संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. एकेकाळी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रभावाखाली आहे. मात्र, या भागात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग असल्याने पक्षाने येथे आक्रमक मोहीम सुरू केली आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दारव्हा तालुक्यातील मौजे बोधेगाव, पिंपळगाव, तरनोळी, करजगाव आणि तरोडा या गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाच ग्राम शाखांचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांनी उपस्थित पदाधिकारी, महिला व कार्यकर्त्यांना संबोधित करताना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला भरभरून साथ देण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सदाशिव तायडे यांच्या नेतृत्वात तालुक्यात पक्षाची संघटनात्मक उभारणी वेगाने सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपक जाधव, तालुकाध्यक्ष सदाशिव तायडे, महासचिव गौतम मुजमुले, महिला आघाडीच्या शारदा धवणे, नोगीता बोरकर, जया नाईक, अविनाश गुरदे, खडसे, प्रल्हाद बरडे, प्रकाश चव्हाण, आकाश खडसे यांच्यासह अनेक महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, दिग्रस, दारव्हा आणि नेर तालुक्यात येत्या काही दिवसांत किमान ५० ग्राम शाखांचे अनावरण करण्याचा संकल्प असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांनी दिली.






