देशाची गुलामीकडे वेगाने घोडदौड!
– शांताराम पंदेरे
दि. २ मार्च. १९३० डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक काळाराम मंदिर सत्याग्रहाचा दिवस! आणि आजच ९६ वर्षांनी वंचित बहुजन आघाडी-मित्र पक्ष-संघटनांची मुंबईत निदर्शने. पहिला सत्याग्रह वंचित बहुजनांच्या मानवी हक्कासाठी! आणि आज २ मार्च २०२६ चा लढा रा.स्व.संघाचे पंतप्रधान मोदी व त्यांच्या गुलाम सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिवाळखोरी आणि अमेरिकेच्या समोरची गुडघे टेकी पॉलिसी विरोधात होता.
मोदींचे असे का होतेय? काय लपवताहेत? बोलत का नाहीत? एवढी हतबलता का? की काही भानगडी झाकण्यासाठीची अमेरिकेची ही गुलामी? अहो नितीमान (?) संघवाले अशी लफ… का करता? सरळ सरळ उघड संसारच थाटा ना? तरुण वयात असलेली संधी सोडून नागपूरच्या केशवकुंज वर पळत गेला? का? की गुजरातचे महात्मा गांधी नागपूर जवळच्या वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून इंग्रजांविरूध्द लढत राहिले. त्यांच्या उद्याच्या भारतासाठीचे नवनवे प्रयोग करत राहिले. हा आश्रम भारतासह जगभरातील लोकांसाठी खुले होते आणि आजही हा सेवाग्राम आश्रम सर्वांसाठी खुला आहे.
मग तुम्हालाही वाटत होते संघही असे काही तरी करून दाखवील! आपणही महात्मा गांधींच्या या आश्रमाला मागे टाकू. पण नंतर आम्ही पाहिले ना! मंडलविरोध, नामांतरविरोधातला टोकाचा विद्वेष, भिमा कोरेगावचा हिंसक नंगानाच! ६ डिसेंबरचा बाबरी उध्वस्तिकरणा मागचा विद्वेष! परवाची युजीसी बाबतची विषाची गरळ आणि आताची इराण विरोधातील गुलामी वृत्ती! इराण वा अन्यत्रच्या हुकूमशाह्यांचा आम्हा लोकशाहिवादी, राज्यघटनावाद्यांचा विरोध होता, आताही आहे आणि उद्याही राहिल. यांच्या विरोधात आम्ही संविधानाच्या अहिंसक मार्गांनीच संघर्ष करत राहू. या न्यायाने इराणच्या खोमेनी राजवटीविरोधात बोलत होतो. पण याचा अर्थ आता व आधिही अमेरिका ज्या पध्दतीने व वर्चस्ववादी वृत्तीने ओसामा-बिन-लादेन, खोमेनी, इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष, भूत्तो, आदींच्याविरोधात, यातील अनेकांच्या संपूर्ण परिवाराला उध्वस्त केलेत, ते आम्ही कदापिही मान्य करणार नाही. कारण यामगे अमेरिकेचा शुध्द हेतू तेथील नैसर्गिक साधनसामुग्री, तेल सामुग्रीवर राजकीय आर्थिक वर्चस्व प्रस्थापितकरून लूट करायची आहे. तेथे व अगदी भारतातही-आसपासच्या राष्ट्रातही त्यांना लष्करी तळ उभारून सर्व दक्षिण आशियावर लक्ष ठेवायचे आहे. आणि संघ-मोदींना हे सारे होवू द्यायचे आहे. म्हणूनच आम्हा वंचित बहुजन आघाडी-मित्र पक्ष-संघटनांचा याला कायमचा विरोधच राहिल. अशा सर्व कारणांनी आम्हा सच्च्या फुले-शाहू-आंबेडकरवादी यावेळी इराणच्या बाजूने ठामपणे उभे आहोत.
याच नागपूरला तुमच्या बांधाला खेटून आमचे प्रेरणादाते लोकशाहीचे पायाभरणीतील एक महान आर्किटेक्चरर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी लाखो वंचित-बहुजन अतिशुद्रांच्या उपस्थितीत व त्यांच्यासह केशवकुंजच्या मनुस्मृतीलाच लाथाडले आणि बौध्द धम्म स्विकारला. भारतीय नव राज्यघटनेला साजेसाच धम्म स्विकारला. तशीच जीवनपध्दती-दृष्टिकोणही स्विकारला.
अशा सर्व ऐतिहासिक लढ्यांच्या पार्श्वभूमिवर भारतीय संविधानाच्या ड्राफ्टिंग समितीचे अध्यक्ष म्हणून अखेरीस बाबासाहेबांनी तोवर सर्व सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि संविधानाला अंतिम स्वरुप दिले. ते राष्ट्राला अर्पण केले. या संविधानाच्या प्रारंभीच्या उद्देशिकेत सुरूवातच केली आहे….
आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा….
तसेच संविधानमधील भाग तेरा, कलमे ३०१ ते ३०५ भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंधांबाबत आहेत.
या सार्वभौमत्व व स्वाभिमानी भारताला संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेबरोबर तेलाच्या महागड्या किंमतीचे व्यवहार व अन्य काहितरी भानगडींच्या-हल्ली गाजणा-या फाईल्स मुळे सारा देश विकला आहे. अशा सा-या उद्योगांमुळेच-अंधारातील उचापतींमुळेच कायम उचापतीखोर, आयतोबा, लूटारू, साम्राज्यवादी अमेरिका व अध्यक्ष ट्रंप यांच्या इराणवरील हल्ल्याच्या समर्थनार्थ मोदी उभे रहातात. निमूटपणे इस्त्रायलचे दौरे करतात. कदाचित इराणवरील ट्रंपच्या नियोजनाची गुप्तपणे बातमी पोचवण्याचे कामही करत असावेत. आणि हे सारे कशासाठी? भारताच्या-भारतीय सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी? अजिबातच नाही! तर इराणविरोधातील तेलसाठे-नैसर्गिक साधनसंपत्तीवरील कब्जा आणि फुकट्या-लूटारू अमेरिकेच्या फायद्यासाठी! रा.स्व.संघाच्या कोणत्या नैतिकतेत हे बसते? केवळ अमेरिकेतील एपस्टीन फाईल्स-कोवळ्या मुलींच्या भिषण अत्याचाराच्या फाईल्स बाहेर येवू नयेत म्हणूनच ना? मग नैतिकतेच्या, शुध्द चारित्र्याच्या कायम थापा मारणारे ब्रह्मचारी (?) मोहन भागवत आत चूप का?
जागतिक अर्थव्यवस्था तज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची आर्थिक सुरक्षा संबंधी अत्यंत स्पष्ट भूमीका घेतली होती. या संदर्भात ते म्हणतात, भारताचा आर्थिक विकास होण्यासाठी परकीय व्यापार आवश्यक आहे. परंतु तो भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा नसावा. तसेच भारताची सुरक्षा आणि देशाचे संरक्षण हेच परराष्ट्र धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे अशी स्पष्ट भूमीका बाबासाहेबांची होती. आणि मोदी नेमके याविरोधात करत सुटले आहेत.
या संदर्भात आमचे सहकारी, कार्यकर्ते व लोकांचे अर्थतज्ञ संजीव चांदोरकर त्यांच्या फेसबुकवरील अर्थ-अन्वयार्थ या पोस्टमध्ये लिहीतात, ट्रम्प यांनी व्हीनेझुएला पाठोपाठ इराणवर हल्ला करणे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय तेल मार्केट आपल्या तालावर नाचवणे हा ट्रम्प यांचा अजेंडा आहे. अमेरिकेतील महाकाय तेल लॉबीजनी ट्रम्प यांना कॅम्पेंन फायनान्स / निवडणूक निधी देऊन मिंधे केले होते. त्या लॉबीज ट्रम्प यांचा अजेंडा ठरवत आहेत हे उघड दिसत आहेत. पुढे चांदोरकर लिहीतात, नजीकच्या भविष्यात आपली तेल सुरक्षा, अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते.
संजीव पुढे म्हणतो, रशिया भारताच्या तेलाची जवळपास एक तृतीयांश गरज भागवत होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढीव आयात करांच्या दडपणाला बळी पडून भारताने रशियाकडून होणारी आयात कमी करत आज २० टक्क्यांवर आणली आहे. त्यावर मात करण्यासाठीच गेल्या काही महिन्यात भारताने आखाती देशांकडून तेल आयात वाढवली होती. ती इराणवरील हल्याने धोक्यात आली आहे. ट्रम्प याना भीक न घालता भारताने पुन्हा रशियाकडे जावे अशीही सूचना संजीव करतात. …
पण मला वाटते, फाईल्स मध्ये हात अडकल्याने मोदी-भारत इतके धाडस दाखवूच शकत नाही. एवढ्यात आणखी एक बातमी येते, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिलं, “आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणून अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने भारतीय रिफायनरींना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सवलत दिली आहे.” आणि आता मोदी आदेश द्यायला मोकळे! नंदीवाला बोले, नंदीबैल मान डोलवे, अशी बैल आणि माकडासारखी अवस्था मोदींच्या भारताने करून घेतली आहे. आणि इकडे महाराष्ट्रात संघाचे-ईव्हिएमचे मुख्यमंत्री मोदी लाडके देवेंद्र फडणवीस म्हणताहेत हा किती मोठा विजय आहे मोदींचा! किती ही गुलामी!
२ मार्च २०२६ चा लढा देशाच्या गुलामीच्या दिशेने ही जी वाटचाल सुरू झाली. ज्या गुलामीचे नेतृत्व मोदी करत आहेत. या गुलामी सम्राटांच्या विरोधात ही निदर्शनं झाली. हे एक गंगेच्या काठचे सम्राट आणि तिकडे मावळतीचे-पश्चिमेकडचे अमेरिकेचे गुलामी लादणारे सम्राट, लूटारू डोनाल्ड ट्रंप, अमेरिकेचे अध्यक्ष आहेत.
विदेश नीती, अर्थ नीती, आरोग्य नीती असेल या सर्व अमेरिका ठरवणार आणि भारत त्यावर अंमल करणार, त्यामुळे देशाला गहाण ठेवण्याचे काम मोदीने केले आहे. एपिस्टीन फाईल मध्ये मोदीचे नाव आले आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे.
याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा आणि देश विकण्यापासून वाचला पाहिजे, यासाठी मुंबईत निदर्शनांचा कार्यक्रम होता.
अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार करारांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी वंचितच्या राज्य अध्यक्ष रेखा ठाकूर, राष्ट्रीय तथा राज्य कार्यकारिणीचे अनेक सदस्य यावेळी बोलले.
युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले, जगभरातील ज्या लोकांचे नाव एपस्टिन फाईल मध्ये आले आहेत, त्या लोकांनी राजीनामे दिले आहेत. भारतातील मंत्री त्या बाबत काहीच बोलत नाही.आमची मागणी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. कारण, आपला पंतप्रधान एका बलात्कारी माणसाचा मित्र आहे. शेवटी त्यांनी तरुण मुलींच्या बाबतीतले एक भयावह सत्य सांगितले, भारतातून आजवर ३० लाख मुली गायब आहेत. याचे उत्तर पंतप्रधानांनी दिले पाहिजे.
या आंदोलनाची काही ठळक वैशिष्ट्ये जाणवली. यात प्रचंड संख्येने स्त्रि-पुरूष सहभागी झाले होते. यातही तरुण-तरुणींची संख्याही मोठी होती. विचारपिठावरील बाळासाहेब, रेखा ठाकूर, प्रा. अंजलीताई आंबेडकर सोडून सर्वजण तरुणच होते.
२ तारखेच्या प्रचारासाठी दोघे-तिघे वगळल्यास मोठ्या संख्येने नवीन चेह-याच्या तरुण महिला कार्यकर्त्या सोशल मिडीयातून प्रभावीपणे भूमीका मांडत होत्या. हे नक्कीच उत्साहवर्धक चित्र आहे. अत्यंत शिस्तीने आले व शिस्तीने सर्वजण परत निघाले. कुठेही हुल्लडबाजी नाही.
एक नक्कीच शंका होती. आपल्या हक्काच्या सोशल मिडीयात सर्व बातम्या होत्या अमेरिका-इराण युध्दाच्या. परंतु प्रबुध्द भारत मिडीया तज्ञ टिम आणि महाराष्ट्रातून आलेले कितीतरी कार्यकर्ते चांगले फोटो, भाषणांचे व्हिडीओ, आणि मजकूर टाकत होते. यांचा ओघ इतका होता की, युध्द बातम्यांना सोशल मिडीयात मागे टाकले होते. खुप खुप अभिनंदन या बहाद्दर कार्यकर्त्यांचे.
त्याचबरोबर यात क्षणाक्षणाला युध्दाच्या भिषण घटना वाचायला-पहायला मिळत
आहेत. इराण मधील मुलींच्या एका शाळेवर अमेरिका-इस्त्रायल संयुक्त युध्दात शक्तिशाली बॉंब टाकण्यात आला. यात शाळेतील १६८ निष्पाप मुलींचे प्राण घेतल्याचे भयावह फोटो समोर आले. यावर युध्द नको बुध्द हवा अशी भूमीका घेणारा एक सहृदय माणूस काय बोलणार? जिथे शब्दच थिटे पडतात. अश्रु आटतात! त्याचवेळी एक मात्र कळते, तंत्रज्ञान—विकसित तंत्रज्ञान, नवनवी भांडवलशाहीची रूपं, विकासही अधिकाधिक नफ्यासाठी, तिथे क्रूरता… निर्दयताही अशीच असते. तिथे माणूस कवडीमोल होतो! तिथे विनाशही असाच असतो. जपान, व्हिएतनाम, क्युबापासून आपण हे सारे पहात आहोत. आणि आता तर इथे आपणही पहात आहोत नागपूरची केशवकुंजी विद्वेष हिंसा!
अशा प्रकारचे विध्वंसन पाहिल्यावर सहार डेलिजानी या इरानियन तुरूंगात जन्मलेल्या लेखिका म्हणते, जर तुमची मुक्तीची संकल्पना अशा प्रकारच्या निरागस, निष्पाप जिवांच्या विध्वंसनातून विकसीत होणारी असेल तर ते स्वातंत्र्यच नाही. ती मुक्तीच नाही.
परंतु अमेरिका-ट्रंप तात्यांची काही सत्यं (?) (असत्याचे धडे) समोर येवू लागले आहेत. संघाचे नितीमान मोदींनी अजूनही युध्द बंदी संदर्भात लाडल्या ट्रंप तात्या व इस्त्रायला काहीही सांगितलेले नाही. कारण त्यांचे आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व घाणीत बरबटले आहे. अनेक आर्थिक घोटाळ्यात संरक्षणविषयक शस्त्रसामुग्री खरेदी गैरव्यवहारातील भानगडी समोर येवू लागल्या आहेत. उत्तरप्रदेशचे फकीर मुख्यमंत्री योगीजी आणि संघाचे पंतप्रधान फकीर मोदी यांनी सर्व मिडीयाला आपल्या गोठ्यात दावणीला बांधले आहे. यांनी स्वत:ची प्रतिमा कशाचिही लालसा नाही. कोणत्याही (?) अधिकच्या गरजा नाहीत. म्हणून आम्ही कफनीतले (अ) स्वच्छ फकीर साधू आहोत. फक्त आम्हाला मतं देत रहा. समाजसेवेसाठी (?) सत्तेवर बसवत रहा. एवढेच सांगत राहिले. आणि आता तर ट्रंप तात्यांच्या खाली अडकून पडल्यामुळे युध्दाची थेट धग भारताच्या बांधावर घेऊन आले आहेत! किती ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची महागुलामी?
अमेरिकेच्या काही मित्रांना तर आता हळू हळू ध्यानात येवू लागलेय यात केवळ आणि केवळ फुकट खाऊ अमेरिकेचाच फायदा होत चाललाय आणि आपण मात्र महागंडवलो गेलेय!
यात अशाच मोठ्या बातम्या येत गेल्या आहेत, स्पेन ब्रिटनने या युध्दात सामिल व्हायला स्पष्ट नकार दिला आहे. त्याचा नक्कीच परिणाम अन्य राष्ट्रांवरही होत असल्याच्याही बातम्या येत आहेत. अमेरिका, इराण या परस्पर विरोधातील गटांतील देश युध्दापासून दूर जाऊ लागले आहेत.
मोदी जसे येथे विविध जाती, धर्मात विद्वेष पसरवून फूट पाडत आहेत व स्वत:चे सत्तेवर रहाण्याचे दिवस पुढे पुढे ढकलत चालले आहेत.. तसेच धोरण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप तात्या यांचेही दिसते. राष्ट्र, वंश, शिया, सुन्नींमध्ये वाद निर्माण करून त्यांचा एपस्टीन फाईलसमध्ये असलेले नांव व अमेरिकेमध्येच त्यांच्याविरोधात वाढत चाललेला असंतोष झाकून टाकायचे धोरण आहे.
नुकतीच बातमी आलीय इराणचे जहाज युद्ध गुन्हेगारी आणि भारताच्या अमेरिकन गुलामीची जी उदाहरणं समोर येवू लागली आहेत, त्यापैकी आणखी एक-भारताच्याच आमंत्रणावरून आलेली आणि येथील लष्करी सरावातून परतणा-या इराणी युद्धनौकेवर कोणतिही पूर्वसूचना न देता श्रीलंकेजवळ अमेरिकेने हल्ला केला. यात ८७ मृत्यूमुखी पडले. तर ३२ जणांचा जीव वाचला आहे. आपल्याकडे आपल्याच आमंत्रणावरून आलेल्या पाहुण्यांबरोबर हा गैरव्यवहार केल्यानंतरही तथाकथित विश्वगुरू? (माफ करा, तसे नाही गुजरात साधू!) त्यांचे तोंड उचकटत नाहीत! जशी संघ-भाजपवाले ज्याला आपल्या पायापाशी आणायचेय, त्याला ईडी ची आणि आता बहुधा अजित पवारांसारखी हेलिकॉप्टर-विमान अपघाताची भिती दाखवताहेत, तशी ट्रंप तात्या एपस्टीन फाईल्स उघडायची धमकी विश्वगुरूला दाखवताहेत की काय? की मुळात ट्रंप तात्या आणि त्यांचे गुलाम मोदी यांनी मिळून हा बनाव केला नसेल कशावरून? म्हणजे भारतीय सागरी तळ वापरून इराणची युध्द नौका उडवायचीच!
आता अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करायला परवानगी दिलीय तिही ३० दिवसांपर्यंत! म्हणजे मोदी फक्त नाचणार ट्रंप तात्यांच्याच तालावर! असेच ना? संघवाल्यांनो आता सांगा, हाच कां तुमचा गुलाम राष्ट्रवाद?
अशा सर्व भूमीका व कार्यक्रमांतून ॲड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील १९८०-८१ ते २०२६ या साडे चार दशकांतील पक्ष-चळवळीच्या सामाजिक राजकारणाकडे पाहिल्यावर काही ठळक वैशिष्ट्ये दाखवता येतात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक भूमी मुक्ती आंदोलनानंतर जवळ जवळ सर्वच चळवळी भावनातिरेकाच्या महापूरापासून दूर नेण्यात बाळासाहेबांना यश आले आहे. पूर्वास्पृश्य समाजासोबतच येथील बहुसंख्य समदु:खी वंचित बहुजन समाजातील विविध धर्म जाती समूहांचे कळीचे प्रश्न घेत-सोडवत अनेक आंदोलनं केली. परिणामी अशा व्यापक, सच्च्या फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीबरोबर हे सर्व समाज हळू हळू जुळायला लागले आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतरच्या पारंपारिक, संकुचित रिपब्लिकन नेते व चळवळींमुळे निर्माण झालेले ग्रह किंबहुना काहिशी विरोधी मानसिकता बाळासाहेबांच्या या जाणिवपूर्वक सुरू केलेल्या प्रक्रियेतून तुटायला सुरूवातच झाली आहे.
त्याचबरोबर आधीची काहिशी अराजकीय पण सत्ताधारी कॉंग्रेस आणि आता सत्ताधारी संघ-भाजपवादी नेतृत्वाला फारसा प्रतिसाद न देता वंचित जनता सत्ताधारी नसलेले बाळासाहेब-वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभी रहात आहे.
याचाच अर्थ वंचित समूहांमध्ये सामाजिक राजकीय जाणिव जागृत करत, आपणही भारतीय राज्यघटनेनुसार येथील विकास प्रक्रियेतील समान भागिदार आहोत ही भावना चेतवली. म्हणूनही येथील निर्णय प्रक्रियेत म्हणजेच सत्तेचे समान हक्कदार आहोत हीही राजकीय जाणिव जागवली. पण त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे वंचित घटक सत्ताधारी बनण्यासाठी सामाजिक बहुसंख्येकडून राजकीय बहुसंख्या बनवावी लागेल. तिची प्रक्रियाहॊ खाली ग्रामपंचायती, जि.प., पं.समितीत निर्माण होवून वंचित बहुजन आघाडी काही ठिकाणी सत्तेत आलेली दिसते.






