पुणे : ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे ज्येष्ठ नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे आज निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीतील एक प्रभावी, लढाऊ आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त करत अन्सारी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. “मंडल आयोग लागू करण्यासाठी उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रातील चळवळीचा एक शिलेदार हरपला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Shabbir Ansari Passes Away)
शब्बीर अन्सारी यांनी अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत देशभरातील ओबीसी समाजाला संघटित करण्यासाठी आयुष्य झोकून दिले. विशेषतः मुस्लिम समाजातील मागास घटकांना ओबीसी प्रवर्गात न्याय्य स्थान मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला.
मंडल आयोग यांच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी ते खंदे समर्थक होते. पसमंदा मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित केले आणि या विषयाला व्यापक सामाजिक व राजकीय व्यासपीठ मिळवून दिले. (Shabbir Ansari Passes Away)
सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीचे मुद्दे सामान्य जनतेपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याची त्यांची शैली ही त्यांची खास ओळख होती. ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांना मोठा आदर मिळत होता. (Shabbir Ansari Passes Away)
अलीकडील ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या जाण्याने ओबीसी चळवळीतील एक मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.






