गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करत भारताला हादरवून सोडणारा मोठा कट उधळून लावला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करणाऱ्या एका टोळीच्या ९ सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये ५ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या कारवाईमुळे देशातील ७ राज्यांवर घोंघावणारे दहशतवादी सावट तूर्तास टळले आहे.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा कट अत्यंत भयंकर होता. दोन वर्षांपूर्वी रचण्यात आलेला हा कट २०२६ मध्ये अमलात आणला जाणार होता. जम्मू-काश्मीर, दिल्ली, मुंबई, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे त्यांचे नियोजन होते. (Ghaziabad Police Action)
अटक करण्यात आलेल्या मुलांचे वय १५ ते १७ वर्षांच्या दरम्यान असून, त्यातील एक मुलगा अवघ्या ९ वीत शिकत आहे. ही मुले पाकिस्तानातील आपल्या हँडलर्सना लष्करी तळांचे फोटो आणि व्हिडिओ, अदानी आणि अंबानींसारख्या उद्योगपतींच्या घरांची रेकी, देशातील अतिसंवेदनशील ठिकाणांची माहिती पुरवत होती.
पोलिसांनी आरोपींकडून ९ मोबाईल फोन आणि १० सिमकार्ड जप्त केली आहेत. संवादासाठी त्यांनी पाकिस्तानी, मलेशियन आणि ब्रिटिश नंबरचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Ghaziabad Police Action)
या प्रकरणाचा धागा पंजाबमध्ये पकडण्यात आलेल्या सुहेल मलिक उर्फ रोमियो याच्याकडून मिळाला. सुहेलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील लाल किल्ल्यानंतर जालंधर हे त्यांचे पुढील लक्ष्य होते. मात्र, स्लीपर सेलचा पर्दाफाश झाल्यामुळे हा मोठा अनर्थ टळला. आतापर्यंत या टोळीच्या एकूण १५ सदस्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर गाझियाबाद मध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.






