-संजीव चांदोरकर
एक डॉलर = ९२.१७ रुपये!
मध्यपूर्वेतील युद्धे आणि डॉलर रुपयांचा विनिमय दर यांचा अन्योन्न संबंध आहे.
जगात विविध भागात छोटी मोठी युद्धे होतच आली आहेत. गेल्या तीन चार वर्षांत तर त्यांची ठिकाणे आणि तीव्रता वाढतच गेली आहेत. त्याचा कमी जास्त परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेवर होतच आला आहे.
पण मध्य पूर्व देशातील ताणतणाव आणि विशेषतः सशस्त्र युद्धे फक्त भारतीय अर्थव्यवस्थेवर नाही तर भारताच्या परकीय चलनाच्या व्यवस्थापनावर आघात करतात.
परकीय गंगाजळी ताणात आली की भारतीय रुपया डॉलर विनिमय दर घसरतो. जे आता घडू लागले आहे. त्यातून महागाई, चढे व्याजदर अशा दुष्टचक्रात भारतीय अर्थव्यवस्था ढकलली जाते..
परकीय चलनाची गंगाजळी अर्थात देशात किती परकीय आले आणि त्यातील किती खर्ची पडले यावर ठरते. आखाती देशातील युद्धे या दोन्ही गोष्टींवर आघात करतात;
तीन प्रकारे.
सर्वात वरच्या नंबरवर आहे अर्थात खनिज तेल. ज्यामुळे परकीय चलनातील खर्च वाढतो
भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के तेल आयात करतो. मध्यपूर्वेतील युद्धामुळे तेलाचे भाव वाढतात. आजच ते ८० डॉलर प्रती बॅरल झाले आहे. जे पी मॉर्गन नुसार हे युद्ध जास्त दिवस चालले तर तो भाव १२० डॉलर प्रति बॅरल होऊ शकतो.
भारत आपल्या तेलाच्या गरजेच्या एक तृतीयांश तेल मध्यपूर्वेतील देशांकडून विकत घेतो. इराणच्या युद्धामुळे फक्त भाव नाही वाढणार तर इराणच्या ताब्यांत असणाऱ्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मुळे तेल घेऊन येणाऱ्या जहाजांचा प्रवास धोक्यात आला आहे. म्हणजे भले आपण चढ्या भावाने तेल खरेदी करायची तयारी दाखवली तरी तेल जहाजे पुढे सरकणार नाहीत. यातून आपल्या देशात तेलाची टंचाई तयार होऊ शकते.
निर्यात घटल्यामुळे परकीय चलनाची आवक कमी होते
भारतातून मध्यपूर्वेतील देशांना विविध वस्तुमालाची निर्यात होत असते. त्यात शेती आणि शेतीशी निगडित वस्तुमाल आहेत. जसे की केळी, आंबे, इतर फळे, मांस इत्यादी. त्याशिवाय कृत्रिम दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तयार कपडे निर्यात होतात. भारताच्या एकूण निर्यातीपैकी १४ टक्के निर्यात मध्यपूर्वेतील देशांना होते..
लक्षात घ्यायचा भाग हा की ती निर्यात घटली तर भारताच्या, महाराष्ट्राच्या शेतीक्षेत्रावर आणि अनेक रोजगार प्रधान क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील केळी आणि आंबा उत्पादक याआधीच सक्रिय झाले आहेत.
मध्यपूर्वेतील देशांमध्ये काम करून देशाकडे परकीय चलन पाठवणे/ रेमिटेन्स कमी होऊ शकतात
जवळपास एक कोटी भारतीय नागरिक या देशांमध्ये आहेत. युनायटेड अमिरात आणि सौदी अरेबिया मध्ये प्रत्येकी ३० लाख. त्यांच्याकडून २०२५ सालात १३५ बिलियन डॉलर्स ( १२ लाख कोटी रुपये) मायदेशी पाठवले गेले आहेत. सर्व देशातील भारतीय भारताकडे जेवढे परकीय चलन पाठवतात त्याच्या ४० टक्के फक्त मध्यपूर्वेतील देशाकडून येते.
मध्यपूर्वेतील युद्धे आणि भारतीय रुपयाचा विनिमय दर यांचा डायरेक्ट संबंध आहे तो असा.
सर्वात महत्वाचे: म्हणून परराष्ट्र नीतीचा आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा सबंध आहे तो असा.
(संदर्भ मनी कंट्रोल)






