रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची परदेशातील ओळखीच्या माध्यमातून तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पडवेकर कॉलनी येथे राहणारे सलील अब्दुल कादीर काझी यांची एका ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे युनायटेड किंगडममधील टिआगो फौरा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपीने विश्वास संपादन करत आर्थिक व्यवहार सुरू केले. (Digital scam)
आरोपीने स्वतःकडे ६० हजार यूके पाउंड व सोने असल्याचा दावा करत ते दिल्ली इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी जप्त केल्याचे सांगितले. ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी व कथित अडचणीतून सुटण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याने फिर्यादीला पटवून दिले. त्यानंतर ‘प्रिया शर्मा’ नावाच्या महिलेने स्वतःला दिल्लीतील पासपोर्ट-इमिग्रेशन कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवत संपर्क साधला आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रकमेची मागणी केली.
रक्कम लवकरच परत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने काझी यांनी त्यांच्या आयसीआयसीआय आणि एचएसबीसी बँक खात्यांतून विविध टप्प्यांत एकूण २२ लाख २१ हजार ४०० रुपये पाठवले. मात्र, ठरलेल्या वेळेत पैसे परत न मिळाल्याने आणि संबंधितांचा संपर्क तुटल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला. (Digital scam)
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परदेशातून कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक रॅकेटचा तपास सुरू असून संबंधित आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Digital scam)
दरम्यान, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना तसेच कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी आवश्यक ती पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.






