बुलडाणा : नांदुरा तालुक्यातील फुली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या ग्रामशाखा फलकाचे उद्घाटन दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखा सावंग यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण वानखेडे यांनी केले.
यावेळी अनिल धुंदळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन पाटील यांनी आपल्या मनोगतात आतापर्यंत घेतलेल्या आरोग्य शिबिरांची माहिती देत अनेक मोठ्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्याचे सांगितले व नागरिकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
छाया बांगर यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत महिलांच्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विशाखा सावंग यांनी ग्रामशाखा कार्यकारिणीच्या कार्यपद्धतीची माहिती देत माता रमाई यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. तसेच त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ठाम मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून नलिनी इंगळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर ढोल-ताशांच्या गजरात विहारापासून बसस्थानकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. बसस्थानक परिसरात विशाखा सावंग व मान्यवरांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी ग्रामशाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विशाखा सावंत (जिल्हाध्यक्ष), छाया बांगर (भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष), नलिनी इंगळे (कार्यक्रमाध्यक्ष), अनिल धुंदळे (तालुकाध्यक्ष), मोहन पाटील, डॉ. मोहम्मद जमीर, भगवान इंगळे, गजानन वाघ, अजबराव गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक व बालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.






