– आकाश शेलार
आज माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत आहोत. इतिहासात अनेक महान व्यक्तींची कार्ये आपल्याला दिसतात, पण त्या कार्यामागे उभ्या असलेल्या सावलीसारख्या व्यक्तींची जिद्द, त्याग आणि प्रेम अनेकदा दुर्लक्षित राहते. माता रमाबाई आंबेडकर हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, शिक्षणाला आणि ध्येयाला निःशब्द पण अखंड साथ दिली.
बाबासाहेबांच्या आयुष्यातील संघर्ष, दारिद्र्य, अपमान, सामाजिक लढाई या सर्व काळात रमाईंनी खंबीरपणे संसार सांभाळला. अठराविश्व दारिद्र्य झेलत, लेकरांचे दुःख पचवत, शेणाच्या गोवऱ्या थापत, इंधन वेचत त्यांनी बाबासाहेबांच्या ज्ञानयज्ञाला इंधन पुरवले. त्यांच्या त्यागामुळेच भिवा ते डॉ. भीमराव आंबेडकर हा प्रवास शक्य झाला असे म्हटले जाते.
बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व आपण कडक शिस्तीचे, विचारवंत, तत्त्वनिष्ठ नेते म्हणून पाहतो. पण त्यांच्या अंतरंगात एक प्रेमळ, हळवा, कुटुंबवत्सल माणूसही होता. याची प्रचीती त्यांच्या रमाईंना लिहिलेल्या पत्रातून येते. या पत्रातून त्यांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, काळजी आणि परस्परांचा आदर प्रकर्षाने जाणवतो.
माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेच ऐतिहासिक पत्र पुन्हा प्रकाशित करत आहोत, जे त्यांच्या नात्यातील बंध आणि त्यागाची साक्ष देते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे माता रमाईंना पत्र
प्रिय रमा,
रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर..?
कशी आहेस रमा तू? तुझी आणि यशवंताची आज मला खूप आठवण येत आहे. तुमच्या आठवणीने माझे मन खूपच हळवे झाले आहे. मागील काही दिवसांमध्ये माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्याबद्दल इकडच्या वर्तमानपत्रात लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा मी विचार करत होतो, आणि माझ्या डोळ्यासमोर आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.
दुःखाच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षांपासून गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होत आहे रमा, पण मी झुंज देत आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू. खूप भावना मनात दाटून आले आहेत. खूपच हळवी झाली आहे मन. खूप व्याकुळही झाले आहे. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली आणि यशवंताची सुद्धा. मला आठवतं तू मला बोटीवर पोहचवायला आली होती.
मी नको म्हणत होतो तरीही तुझे मन राहवले नाही. तेव्हा मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तेव्हा ते चित्र तू पाहत होतीस तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेने तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस पण तुझे डोळे जे शब्दांनी सांगता येत नव्हतं ते सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं.
तुझ्या गळ्यातील का आवंढा ओठांपर्यंत येऊन थडकत होता. ओठातल्या शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी माझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे इंग्लंडमध्ये या साऱ्या गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे.
कशी आहेस रमा तू? माझा यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो का तो? त्याचे संधिवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा, आपली चारही मुले आपल्याला सोडून गेली. आता आहे आपला फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. त्याला खूप अभ्यासही करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवत जा.
माझे बाबाही मला रात्री अभ्यासासाठी उठवीत असायचे. तोवर ते जागे राहत असत. ती शिस्त त्यांनीच लावली. मी उठलो मी अभ्यास सुरू केला की मग ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई, त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला याचे सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना जाते. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहिले.
मी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळ आली. फार फार आनंद वाटतोय रमा आज. रमा यशवंतच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे. रमा, वैभव सुबत्ता ही सर्व निरर्थक आहे.
तू अवतीभोवती पाहते आहेसच ना माणसे अशाच गोष्टींच्या मागे लागलेली असतात. त्यांची जीवन जिथून सुरू होतात तिथेच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्य जागा बदलत नाहीत, आपल्याला असे जगून चालणार नाही. आपल्याजवळ दुःखात शिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय गरिबी दुःख याच्याशिवाय आपल्याला कसलीही सोबत नाहीअडचणी संकटे आपल्याला सोडत नाहीत.
अपमान छळ अहवेलना ह्या गोष्टी आपल्याला सावली सारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे. दुःखाची समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे. आपणच आपला मार्ग झाला पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावरचा जिद्दीचा प्रवास देखील आपलाच झाला पाहिजे.
आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत म्हणून म्हणतोय रमा यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची आणि त्याची काळजी घे. त्याच्यात जिद्द जागव.
मला काहीच कळत नाही असेही नाही रमा, मला कळतंय कि, रमा या दुःखाच्या वनव्यात तू स्वतः करपून जात आहेस. पाने गळून जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होत आहेस. मी तरी काय करू? एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा, वसा ज्ञानाचा! विज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचेही भान नाही. पण ही शक्ती मिळवण्यात तुझा ही महत्वाचा वाटा आहे.
तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनाने ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेत आहे. खरं सांगू रमा मी निर्दयी नाही, जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कुणी सादही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो.
मलाही हृदय आहे रमा. मी कळवळतो परंतु मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी. म्हणून मला स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुलाही आणि यशवंतलाही कितीतरी झळा बसतात हेही तितकेच खरे आहे. हे लिहिताना रमा मी उजव्या हाताने लिहीत आहे आणि डाव्या हाताने माझी अनावर झालेली आसवे पुसत आहे. त्याला सांभाळ रमा त्याला मारू नको, मी कधी त्याला मारले होते याची आठवणीही त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घटक आहे.
माणसाच्या धार्मिक गुलामगिरीचा आर्थिक आणि सामाजिक उचनीचतेच्या गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसले आहेत त्यामुळे त्याला पार जाळून पुसून टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजे.
रमा तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.
रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर? तु मला साथी म्हणून मिळाली नसती तर? तर काय झालं असतं?
केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गौऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गौऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामाला जाणे हे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत हे कोण पसंत करेल? घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढ्याच काड्याची पेटीमध्ये महिना निघाला पाहिजे, एवढेचधान्य एवढेच ते लिमिट महिनाभर पुरले पाहिजे.
हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले आदेश हे तुला गोड वाटले नसते तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती. आणि तिला त्या त्या वेळी लगेच आहोटी ही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा. जीवनाचा सर्व सूर बेसूर झाला असता. सगळीच मोडतोड झाली असती. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करू नको सर्वात भूषण सांग.
कळावे,
तुझाच भीमराव
हे पत्र वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या आणि माता रमाईंच्या नात्यातील बंध प्रेम दिसून येते. आजच्या काळात असा समजूतदारपणा बंध आणि प्रेम कुठेच पाहायला दिसत नाही. बाबासाहेबांसाठी काबाड कष्ट करणारी बॅरिस्टरची पत्नी असताना आपल्या पतीच्या स्वप्नांसाठी राबणारी रमाई आणि इथल्या कोट्यावधी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे बाबासाहेब यांच्या नात्यातील गोडवा आणि यांचे प्रेम शब्दांत मावणारे नाही हे ही तितकंच खरं.






