विकासाचा निधी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली – सुजात आंबेडकर यांचे जोरदार आवाहन
औरंगाबाद: “आतापर्यंत जनतेच्या विकासासाठी आलेला निधी लुटणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. परिवर्तन घडवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या प्रतिनिधींना सत्तेत पाठवावे लागेल,” असे ठाम प्रतिपादन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पालोद (सिल्लोड) येथे आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. (Sujat ambedkar)

सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे धोरण आणि आगामी काळातील विकासाचा आराखडा सविस्तरपणे मांडला. “सत्ता ही केवळ सत्तेसाठी नसून ती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी असते,” असे सांगत त्यांनी ग्रामीण भागाचा सर्वांगीण कायापालट करण्याचे आश्वासन दिले.
वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास पुढील प्रमुख निर्णय राबवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या शाळांचे आधुनिकीकरण करून डिजिटल सुविधा, प्रशिक्षित शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल, प्रत्येक गावात सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून गरीब व वंचितांना मोफत आणि वेळेवर उपचार मिळतील याची व्यवस्था केली जाईल, शेतकऱ्यांना पिकांना योग्य हमीभाव, प्रभावी पीकविमा योजना आणि नैसर्गिक आपत्तीत तात्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी ठोस धोरण राबवले जाईल, प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वीज व स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. (Sujat ambedkar)

या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष अंजन साळवे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. सिल्लोड तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या नागरिकांनी सभास्थळी मोठी गर्दी केली होती. सभेतील उत्साह आणि जनतेचा प्रतिसाद पाहता, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे स्पष्टपणे दिसून आले.





