औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा विकास साधायचा असेल, तर वंचित, उपेक्षित घटकांचे हक्काचे प्रतिनिधी सत्तेत जाणे अत्यावश्यक आहे. मात्र आतापर्यंत सत्तेवर असलेल्या प्रस्थापित नेत्यांनी विकासाच्या नावाखाली केवळ निधी लुटण्याचेच काम केले, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील घायगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत मतदारांना परिवर्तनाचा स्पष्ट संदेश दिला. )Sujat Ambedkar election campaign)
सुजात आंबेडकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रस्थापित पक्षांनी जनतेच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेती अशा मूलभूत प्रश्नांवर केवळ आश्वासनांची पेरणी झाली, प्रत्यक्षात मात्र विकासनिधीचा गैरवापर झाला. वंचित समाजाच्या समस्या केवळ त्या समाजातून निवडून गेलेले प्रतिनिधीच प्रामाणिकपणे सोडवू शकतात, असे ते म्हणाले.

सत्तेत आल्यास वंचित बहुजन आघाडी सर्वसमावेशक विकासावर भर देईल, असे आश्वासन देताना सुजात आंबेडकर यांनी पुढील मुद्द्यांवर भर दिला, गावोगावी दर्जेदार रस्त्यांचे जाळे, प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे, गरीब व वंचित मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण शेतकऱ्यांच्या पाणी, कर्ज व उत्पादन खर्चाशी संबंधित गंभीर प्रश्न सोडवणे. सत्ता ही लुटीसाठी नव्हे, तर सेवेचे साधन असली पाहिजे, असे ते ठामपणे म्हणाले. (Sujat Ambedkar)
स्थानिक पातळीवर खरा बदल घडवायचा असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले. “ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर आपल्या हक्कांची आणि भविष्यातील पिढीच्या विकासाची आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या जाहीर सभेला घायगावसह परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सोयगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः तरुण वर्गात सुजात आंबेडकर यांच्या भाषणाबद्दल मोठी उत्सुकता आणि उत्साह दिसून आला.






