शिरूर : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची जाहीर सभा आज शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कांबळगा येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवत विकासाचा मुद्दा मांडला. (Anjali ambedkar)
सभेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढत आहे. त्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्द्यांवर भर दिला –
-गावखेड्यांत दर्जेदार रस्ते आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार.
– ग्रामीण भागातील जनतेला शहरात न धावता गावातच सर्वोत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.
– जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था थांबवून त्यांची पुनर्बांधणी करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात जोपर्यंत वंचित समाजघटकांचे प्रतिनिधी पोहोचत नाहीत, तोपर्यंत सर्वांगीण विकास शक्य नाही. त्यामुळे विकासाची नवी पहाट पाहण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तसेच या जाहीर सभेला कांबळगा आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (Anjali ambedkar)
व्यासपीठावर वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमोल लांडगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, सुजाता अजनिकर यांच्यासह पक्षाचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सभेमुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





