मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. गुरुवारी, ८ जानेवारी रोजी दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ निवासस्थानी पक्षाचा अधिकृत निवडणूक जाहीरनामा दिमाखात प्रसिद्ध करण्यात आला.
‘लोकआवाज, लोकसंकल्प, लोकशक्ती’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या जाहीरनाम्यातून मुंबईतील सामान्य आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
या ऐतिहासिक जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये प्रा. अंजलीताई आंबेडकर (राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थ मोकळे (राज्य उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते), चेतन अहिरे (मुंबई अध्यक्ष), स्नेहल सोहनी (महिला आघाडी मुंबई अध्यक्ष), सागर गवई (मुंबई युवा अध्यक्ष) यांची उपस्थिती होते. तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नेत्यांनी हजेरी लावली होती.
जनतेच्या वेदनांचा थेट दस्तऐवज
वंचित बहुजन आघाडीने हा जाहीरनामा तयार करताना एक वेगळी पद्धत अवलंबली आहे. हा मसुदा कोणत्याही बंद खोलीत बसून तयार केलेला नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर, वस्त्यांमध्ये, चाळीत, झोपडपट्ट्यांमध्ये आणि लोकांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन केलेल्या संवादातून हा जाहीरनामा साकारला आहे.
मुंबईकरांच्या दैनंदिन संघर्षाचा आणि आकांक्षांचा हा थेट प्रतिबिंब असल्याचे नेत्यांनी यावेळी नमूद केले.
जाहीरनाम्यात ज्यांच्या श्रमावर मुंबई चालते, त्यांच्या हक्कांच्या तरतुद, सुरक्षा, शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी, सामाजिक न्याय आणि हक्कांचे संरक्षण, ड्रेनेज, शुद्ध पाणी आणि दर्जेदार आरोग्याचा अधिकार, ज्यांचा आवाज प्रस्थापित राजकारणात नेहमी दडपला जातो, त्यांचा बुलंद ‘लोकआवाज’ बनून वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिकेत उतरली आहे,” असा विश्वास यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केला.






