औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, वंचित व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी चळवळ आहे. जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तींना सत्तेबाहेर ठेवा आणि आपल्या हक्कासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून द्या, असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेवराई तांडा येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Sujat ambedkar)

सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात स्थानिक पातळीवरील विकासाच्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या घटकांसाठी वंचित बहुजन आघाडी ठोस धोरण राबवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्तेत बसलेल्यांनी वर्षानुवर्षे जनतेची फसवणूक केली आहे. आता केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. (Sujat ambedkar)

सभेदरम्यान सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षांवर तीव्र शब्दांत टीका केली. भ्रष्टाचार, निधींचा गैरवापर आणि विकासकामांतील हलगर्जीपणा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. ही निवडणूक म्हणजे बदलाची संधी आहे. भ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी मतदारांनी जागृत राहून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या प्रचार सभेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. युवक, महिला, शेतकरी तसेच विविध समाजघटकांनी सभेला उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. (Sujat ambedkar)

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, स्थानिक उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकरांच्या या आक्रमक व मुद्देसूद भाषणामुळे गेवराई तांडा परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.






