औरंगाबाद : आतापर्यंत सत्तेवर असलेल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी वंचित, बहुजन आणि सामान्य जनतेचा केवळ मतांसाठी वापर केला. विकासाच्या नावाखाली आलेला निधी लुटण्याशिवाय या नेत्यांनी काहीही केले नाही. आता या लुटारू प्रवृत्तीला सत्तेबाहेर फेकण्याची वेळ आली आहे. आपले हक्क, न्याय आणि खरा विकास मिळवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर फर्दापूर (ता. सोयगाव) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Sujat ambedkar election campaign)
आपल्या भाषणात सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून ठरावीक नेते आणि पक्ष सत्तेवर कब्जा करून बसले आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक वंचित समाज, शेतकरी, कामगार आणि तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. परिणामी सामान्य जनतेचा विकास खुंटला आहे.
पुढे ते म्हणाले, जोपर्यंत वंचित समाजाचे खरे प्रतिनिधी सभागृहात जात नाहीत, तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही. त्यामुळे संघटित व्हा आणि वंचित बहुजन आघाडीला बळ द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Sujat ambedkar election campaign)
या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. व्यासपीठावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, युवा आघाडीचे औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सोयगाव तालुक्यातील नागरिक, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





