करंजखेड : औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी करंजखेड येथे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा पार पडली.
या सभेत बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सर्वसामान्य, वंचित आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली जाईल. (Sujat ambedkar election campaign(
पुढे ते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील. यासोबतच प्रत्येक गावात दर्जेदार आरोग्य सुविधा सक्षम केल्या जातील, प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट केली जातील आणि गोरगरिबांना वेळेत उपचार मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस योजना राबवण्यात येतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी योग्य हमीभाव, पीकविमा आणि नुकसानभरपाईसाठी प्रभावी धोरण राबवण्याचे आश्वासन दिले. “शेतकरी सुखी तर देश सुखी” या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडी काम करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (Sujat ambedkar election campaign)

या जाहीर सभेस वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष अंजन साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सिल्लोड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वंचित बहुजन आघाडीच्या घोषणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.






