औरंगाबाद : भारत सरकारचे परराष्ट्र धोरण, संरक्षण करार आणि व्यापारी अटी यावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. सुभेदारी गेस्ट हाऊस, औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राफेल करार, अमेरिकेसोबतचा व्यापार करार आणि रशिया-इराणसोबतच्या संबंधांवरून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
इंडोनेशियाने नुकताच फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीसोबत ४२ राफेल विमानांसाठी ८.१ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. या संदर्भात बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतानेही राफेल विमाने खरेदी केली, मात्र भारत आणि इंडोनेशिया यांच्या करारातील किमती आणि तांत्रिक अटींमध्ये मोठी तफावत का आहे? विशेषतः विमानाच्या सोर्स कोड वर भारताचे पूर्ण तांत्रिक नियंत्रण आहे का? यावर सरकारने पारदर्शकता दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली. (Prakash Ambedkar)
अमेरिकेसोबत होत असलेल्या व्यापार कराराबाबत आंबेडकर यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, अमेरिकेचा माल भारतात ‘झिरो टॅरिफ’वर येणार, पण भारताच्या मालावर तेथे १८% टॅरिफ लावला जात आहे. भारतीय सोलर पॅनेलवर चक्क १५०% टॅरिफ आकारला जात असल्याच्या चर्चा आहेत. या अटींमुळे भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कृषी उत्पादनांचे ‘डंपिंग’ होऊन भारतीय शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. (Prakash Ambedkar)
भारत आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणापासून दूर जाऊन अमेरिकेच्या दबावाखाली काम करत आहे का? असा सवाल आंबेडकरांनी विचारला. रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणारे तेल बंद करणे आणि चाबहार बंदर प्रकल्पात भारताची भूमिका मर्यादित होणे, हे अमेरिकेच्या दबावामुळे घडत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच, भविष्यात अमेरिका-इस्रायलने इराणवर लष्करी कारवाई केल्यास भारत आपली तटस्थता टिकवणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
एपस्टिन फाईल्समध्ये पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख असल्याच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केले. या आरोपावर सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. देशाचे सार्वभौमत्व आणि आर्थिक धोरण बाह्य शक्तींच्या दबावाखाली असल्यास तो गंभीर चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले. स्वतःला देशभक्त म्हणवणारी आरएसएस (RSS) आज देश गहाण ठेवला जात असताना गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Prakash Ambedkar)
मध्यमवर्गीयांनी या मुद्द्यांवर जागे होण्याची गरज असून, देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी वंचित समूह आता नेतृत्वाची धुरा सांभाळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांनी या धोरणांच्या दीर्घकालीन परिणामांविरुद्ध जागरूक होण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. या मुद्द्यांवर लवकरच तीव्र आंदोलने आणि धरणे धरली जातील, असा इशाराही ॲड. प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला.





