नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. या मागणीला आगरी आणि कोळी समाजासोबतच वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीही पाठिंबा दिला होता आणि आता पुन्हा एकदा या मागणीसाठी लढा उभारण्यात येत आहे. (Dinkar Balu Patil)
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत x (twitter) हॅण्डलवर ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात काल आगरी-कोळी समूहाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली.
त्यांनी केंद्रीय स्तरावर या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मागील सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, सध्याच्या सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे. (Dinkar Balu Patil)
रायगड जिल्ह्यातील उलवे, कोपर, पनवेल पट्ट्यातील मूळ रहिवासी आणि भूमिपुत्र असलेल्या आगरी आणि कोळी बांधवांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी बहुमोल योगदान दिले असून, त्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले होते. ते ओबीसींच्या जागृती आणि हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे एक लढाऊ नेते होते, असे ते म्हणाले. (Dinkar Balu Patil)
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, जर सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, तर आगरी आणि कोळी बांधवांसह वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. असा इशारा त्यांनी दिला आहे.