खरात यांना ‘मॅक्सिमम सिक्युरिटी’ द्या; मराठा की इतर जात? मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी अशोक खरात प्रकरणावर तीव्र भूमिका घेत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अशोक खरात यांना तात्काळ ‘मॅक्सिमम सिक्युरिटी’ देण्याची मागणी करत, त्यांच्या सुरक्षेबरोबरच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून स्पष्टपणे मागणी केली की, अशोक खरात हे मराठा समाजातील आहेत की इतर कोणत्या जातीत मोडतात, याची अधिकृत चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात जातीय कोनातून सत्य समोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, अशोक खरात यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात मराठा समाजातील आरोपींना वाचवण्याचा जाणूनबुजून प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या वक्तव्यामुळे अशोक खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

