मुंबई: मुंबई मध्य रेल्वेमार्गावर मुंब्रा लोकल रेल्वे अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. दोन लोकल रेल्वे गाड्या एकमेकांजवळून विरुद्ध दिशेने जाताना, दरवाजात लटकलेल्या प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली. त्यातून 13 प्रवासी खाली पडल्याने 4 जणांचा मृत्यू व 9 जण जखमी झाले.
दरम्यान जखमींवर कळवा आणि मुंब्र्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कळव्यातील काही जखमींना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली आहे. या अपघातानंतर अनेक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले असून रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे असे अपघात सातत्याने होत असल्याचे म्हटले आहे. तसेच अपघातातील मृत्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी व जखमींवर मोफत उपचार केले जावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंंबेडकर यांनी केली आहे. तसेच या सारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात असेही आंबेडक यांनी म्हटले आहे.