मुंबई : आज सकाळी दिवा ते मुंब्रा स्थानकावर घडलेली रेल्वे दुर्घटना ही अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. अनेक निष्पाप प्रवाशांचा जीव गमावणे ही गोष्ट कोणत्याही संवेदनशील समाजासाठी असह्य आहे. जर भारतीय रेल्वेने सोशल मीडियावरील रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले असते, तर हे कधीच घडले नसते. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रित धोरण राबवले असते, आणि सोशल मीडियावरील दिखाऊपणाऐवजी प्रत्यक्ष सुरक्षेवर लक्ष दिले असते, तर ही दुर्घटना टाळता आली असती.
मी शासनाकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करतो, जेणेकरून संपूर्ण सत्य जनतेसमोर येईल आणि जबाबदारी निश्चित होईल. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून केली. दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना तत्काळ आर्थिक आणि वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक आहे. अशा प्रसंगी सरकारने संवेदनशीलता आणि तत्परता दाखवावी. ही दुर्घटना केवळ एक अपघात म्हणून न नोंदवता एक चेतावणी म्हणून पाहण्याची गरज आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणांमध्ये मूलगामी सुधारणा आणि धोरणात्मक कृती आवश्यक आहेत. असेही ते म्हणाले.