मुंबई – अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान (PCPNDT) च्या दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार असून, महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील काही रुग्णालयात महिला ऊसतोड कामगारांच्या अवैध व अनावश्यक गर्भ पिशव्या काढल्या जात असल्या बाबतची बातमी वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती. त्या अनुषंगाने बीडमधील या प्रश्नाची आरोग्य मंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन त्यांचे मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित केली होती.
ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशय शस्त्रक्रियेचा विषय अत्यंत संवेदनशील व गंभीर असुन, शासनाने घालून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच शस्त्रक्रिया होतील याबाबत दक्ष राहण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच अवैध गर्भ पिशव्या काढल्याच्या तक्रारीचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रियेनंतर महिलांना होणाऱ्या दुष्परिणामा बद्दल समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. महिलांच्या आरोग्याच्या बाबतची कोणतीही चुकीची बाब खपवून घेतली जाणार नसल्याचे यावेळी आरोग्य मंत्री यांनी सांगितले.
तसेच (PCPNDT) कायद्या अंतर्गत खाजगी रुग्णालयाकडून दरमहा अहवाल घेऊन काही अवैध प्रकार घडु नये याबाबत नियंत्रण ठेवले जाते. त्याचप्रमाणे गर्भाशय शस्त्रक्रियेचा अहवालाची विभागाने पडताळणी करावी अशा सुचना दिल्या आहेत. तसेच सर्व वैद्यकिय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय स्तरावर सुध्दा गर्भाशय शस्त्रक्रियेस परवानगी देण्याबाबत शहानिशा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.