– आकाश शेलार
आपण रोज स्वच्छ रस्ते पाहतो, कचरा वेळेवर उचलला जातो, शहर नीटनेटके दिसते आणि आपण समाधान मानतो की व्यवस्था चांगली काम करते. पण या स्वच्छतेमागे कोणाचे आयुष्य झिजते, कोणत्या हातांनी हा कचरा उचलला जातो आणि त्या हातांची सामाजिक ओळख काय आहे, हा प्रश्न आपण क्वचितच विचारतो.
भारतामध्ये नोंदणीकृत कचरा वेचकांची संख्या 1,52,813 आहे. हा आकडा सामाजिक वास्तवाचे जिवंत चित्र उभे करतो. या कचरा वेचकांपैकी 84.5 टक्के लोक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजातील आहेत. अनुसूचित जातींचे 92,089, अनुसूचित जमातींचे 16,039 आणि इतर मागासवर्गीयांचे 20,954 कचरा वेचक या यादीत आहेत. दर दहा कचरा वेचकांपैकी जवळपास सहा जण दलित समाजातील आहेत. अनुसूचित जातींचा वाटा 60.3 टक्के आहे. या तुलनेत सर्वसाधारण प्रवर्गातील कचरा वेचकांची संख्या 16,329 म्हणजे 10.7 टक्के.
ही आकडेवारी भारतातील जात आणि काम यांच्यातील खोलवर नातं उघड करते. पिढ्यान् पिढ्या काही समाजघटक विशिष्ट कामांशी जोडले गेले आणि आजही तेच वास्तव वेगळ्या रूपात दिसते. स्वच्छतेच्या कामाशी दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाचे इतके मोठे प्रमाण जोडलेले असणे योगायोग नाही.
या कामात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. महिला कचरा वेचकांची संख्या 75,427 आहे तर पुरुषांची 78,374. जवळपास अर्धी संख्या महिलांची आहे. कचरा वेचणे, त्याची छाटणी करणे, अस्वच्छ आणि आरोग्यास घातक परिस्थितीत दिवसभर काम करणे आणि तरीही सामाजिक सन्मान न मिळणे, ही त्यांची दैनंदिन वस्तुस्थिती आहे.
प्रादेशिक पातळीवर महाराष्ट्रात 36,982 नोंदणीकृत कचरा वेचक आहेत. त्यानंतर तामिळनाडू 26,012 आणि उत्तर प्रदेश 14,212. समस्या एखाद्या राज्यापुरती मर्यादित नसून देशभर पसरलेली आहे.
ही माहिती सामाजिक न्याय मंत्रालयाने नमस्ते योजनेअंतर्गत संसदेत सादर केली आहे. स्वच्छतेच्या कामाशी विशिष्ट समाजघटकांचे असमान प्रमाण जोडलेले असल्याचे वास्तव यातून स्पष्ट होते. प्रश्न असा उरतो की या आकडेवारीकडे आपण माहिती म्हणून पाहणार की सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विचार करणार.
आपण स्वच्छ भारताची कल्पना मांडतो, शहरांच्या सौंदर्यीकरणाच्या योजना आखतो, परंतु त्या स्वच्छतेच्या पाठीमागे उभ्या असलेल्या मानवी जीवनाकडे पाहण्याची तयारी दाखवत नाही. स्वच्छता ही कचरा उचलण्याची प्रक्रिया नाही तर मानवी सन्मानाशी जोडलेली बाब आहे. जे हात आपला कचरा उचलतात, त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळते का, हा मूलभूत प्रश्न आहे.
स्वच्छतेचा प्रश्न नगररचना किंवा आरोग्यापुरता मर्यादित राहत नाही. तो सामाजिक समतेचा, मानवी प्रतिष्ठेचा आणि न्यायाचा विषय आहे. जोपर्यंत कचरा वेचण्याचे काम विशिष्ट समाजघटकांपुरते मर्यादित राहील, तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वच्छ समाज घडणार नाही. स्वच्छ शहरांसोबत स्वच्छ विचारांचीही गरज आहे.






