मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. असे असताना, भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रांत दिलेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने दिलेल्या पूर्ण पान ‘श्रद्धांजली’ जाहिरातींमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून, हा केवळ शोक नसून राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व मिळवण्याचा एक सुनियोजित ‘राजकीय डाव’ असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
आचारसंहिता आणि जाहिरातीचा पेच
निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना राजकीय पक्षांच्या जाहिरातींवर कडक निर्बंध असतात. मात्र, भाजपने ‘श्रद्धांजली’ या नावाखाली वृत्तपत्रांत भाजपच्या पक्ष चिन्हासह पूर्ण पान जाहिराती प्रसिद्ध केल्या.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले, त्या दिवशी त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा स्वरूपाच्या मोठ्या जाहिराती दिल्या नव्हत्या. मात्र, भाजपने दाखवलेली ही ‘तत्परता’ अनेकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जेव्हा अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, त्याच दिवशी भाजपच्या या भावपूर्ण जाहिराती प्रसिद्ध झाल्या. एकीकडे दुःखद प्रसंग असताना भाजपने श्रद्धांजली जाहिरातीच्या आडून स्वतःचा प्रचार करण्याची संधी सोडली नाही. निवडणूक आयोगाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे देखील बोलले जात आहे.





