औरंगाबाद : “साहित्याचा विचार करताना जो माणूस जातीवाद आणि भेदाभेद मानतो, त्याला साहित्यिक म्हणता येणार नाही. समाजातील या जातीभेदाच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत भूमिका घेतली जात नाही, तोपर्यंत साहित्याला व्यापकत्व येत नाही,” असे परखड मत लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केले.
‘विद्रोही सांस्कृतिक चळवळी’च्या वतीने रविवारी एन-३ सिडको येथील जिजाऊ सभागृहात नांदेड येथील होणाऱ्या २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत यांच्या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे अध्यक्षस्थानी होते, तर डॉ. संजय मून, डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना लोकनाथ यशवंत म्हणाले की, “भारतीयांच्या डीएनएमधून जात जात नाही आणि लोक आजही आडनावावरून जात ओळखतात, म्हणूनच मी आडनाव लावणे सोडले आहे,” माझ्या लहानपणी वडिलांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मित्र सुटत गेले आणि त्यातूनच कविता सुचू लागली. अमरावतीमध्ये एका वृद्ध मजुराला मालकाकडून मिळणारी अमानुष मारहाण पाहून मी अस्वस्थ झालो आणि त्याचे दुःख शब्दांत मांडले. “जगाचे कल्याण व्हावे आणि प्रत्येकाला दोन वेळचे अन्न मिळावे हीच माझी भूमिका आहे, कारण पोट रिकामे राहिले तर माणसे गुन्हेगार होतात,” असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, महात्मा फुले यांनी साहित्य संमेलनावर लिहिलेले पत्र हेच विद्रोही साहित्याचे सूत्र आहे. जातीचे परिप्रेक्ष्य तोडणे हेच विद्रोही साहित्याचे खरे काम असून, आधुनिक कवितेचे जनक केशवसुत नसून सावित्रीबाई फुले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. संजय मून यांनी लोकनाथ यशवंत यांना ‘आजच्या पिढीचा आवाज’ संबोधले. त्यांच्या कवितेला उर्दू शायरीप्रमाणे उत्स्फूर्त दाद मिळते आणि ती शब्दांपेक्षा अधिक आशयाने खुलते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भारत शिरसाट यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले तर आभार डॉ. वैजनाथ कदम यांनी मानले. या सोहळ्याला पत्रकार साहित्यिक भाऊ भोजने, डॉ.अरुणा लोखंडे, डॉ. कमलाकर गंगावणे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. यशवंत खडसे, संजय वरकड, डॉ. रेखा मेश्राम, अँड. वैशाली डोळस, वा. ना. भालेराव, डॉ. सविता लोंढे, आशा डांगे, डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ. भगवान धांडे, संगीता अंभोरे, मंगल मुन, डॉ सुभाष बागल, सुधाकर निसर्ग, डॉ. द्रौपदी पंदीलवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.





