अमरावती: कृषी क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी आणि कृषी दिनाच्या शुभ मुहूर्तावर, विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सीमावर्ती भागातील भ्रष्ट कारभाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, यवतमाळ यांच्या वतीने अमरावती येथे अन्नत्याग आणि आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. (Amravati protest)
हे उपोषण पिंपळखुटी (ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ) येथील परिवहन तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आहे. वंचित बहुजन आघाडीने ९ जून २०२५ रोजी परिवहन विभाग, अमरावती यांना लेखी निवेदनाद्वारे पिंपळखुटी चेकपोस्टवरील भ्रष्टाचाराची गंभीर माहिती दिली होती.
त्यानंतर १८ जून रोजी स्मरणपत्र पाठवूनही कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.विशेष म्हणजे, २६ जून रोजी संबंधित कार्यालयात थेट भेट देऊन सीसीटीव्ही प्रणाली बसवण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु ती देखील नाकारण्यात आली. (Amravati protest)
या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पिंपळखुटी तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही प्रणाली बसवण्यासाठी आवश्यक असलेले सीसीटीव्ही संच आणि साहित्य स्वतः वंचित बहुजन आघाडी देण्यास तयार आहे, परंतु क्षेत्रीय परिवहन अधिकारी, परिवहन विभाग अमरावती यांनी ते साहित्य स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
यामुळे संबंधित यंत्रणांकडून या गंभीर प्रकरणात अपारदर्शकता आणि निष्क्रियता दिसून येत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कृषी दिन साजरा करत असताना, वंचित बहुजन आघाडी भ्रष्ट व्यवस्थेविरोधात संघर्ष करत आहे. (Amravati protest)
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि पारदर्शकता निर्माण करण्यासाठी हा लोकशाही मार्गाने लढा सुरू करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य मागण्या –
1) पिंपळखुटी नाक्यावरील लाचखोरी आणि बेकायदेशीर वाहतूक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
2) सीसीटीव्ही तात्काळ बसवणूक सर्व्हरवर थेट देखरेख ठेवण्यात यावी.
3) या प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
4) भ्रष्ट यंत्रणेचा बंदोबस्त करून, शेतकरी हिताची आणि कायदा सुव्यवस्थेची पूर्तता करण्यात यावी.
वंचित बहुजन आघाडी यवतमाळच्या वतीने सांगण्यात आले की, “लोकशाही मार्गाने लढा उभारूनच यंत्रणा बदलावी लागेल,” आणि याच विश्वासाने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. (Amravati protest)
या उपोषणात वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, महासचिव शिवदास कांबळे, अमरावती शहराध्यक्ष मनोज चौधरी यांच्यासह प्रमोद राऊत, रमेश आठवले, सागर भवते, शैलेश बागडे, प्रशांत गजभिये, भूषण हिवराळे, विजय डोंगरे, सुनील उके, विजय भिसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित आहेत.