बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटाने एकीकडे त्यांची दमदार भूमिका विजय दीनानाथ चौहानमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले, तर दुसरीकडे या चित्रपटाशी संबंधित एक वादग्रस्त घटना देखील घडली होती. नुकताच अभिषेक बच्चनने या घटनेची आठवण सांगितली आणि पुन्हा एकदा हा प्रसंग चर्चेत आला आहे. १९९० साली
प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी वेगळ्या शैलीत, घशातून जड आवाज काढत विजय दीनानाथ चौहान ही भूमिका साकारली होती. मात्र, प्रेक्षकांना त्यांचा हा कृत्रिम आवाज अजिबात भावला नाही. चित्रपटगृहात बसलेले प्रेक्षक इतके चिडले की त्यांनी प्रत्यक्ष थिएटरमध्येच तोडफोड केली. खुर्च्या फोडल्या, साऊंड सिस्टीमवर तुफान राग काढला आणि चित्रपटगृहाचं मोठं नुकसान झालं.
या घटनेचा उल्लेख करताना अभिषेक बच्चन म्हणाला, “लोकांना बाबांचा आवाज ऐकून खूप राग आला होता. त्यांनी थिएटरमध्ये खुर्च्या फोडल्या, साऊंड सिस्टीम तोडली. हे सर्व आमच्यासाठी खूप धक्कादायक होतं.
जरी ‘अग्निपथ’ चित्रपटाला त्या काळात व्यावसायिक यश मिळालं नाही, तरी कालांतराने हा चित्रपट ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जाऊ लागला. अमिताभ बच्चन यांची ही भूमिका आजही अनेक चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहे.