नवी दिल्ली : जगात इराण इस्रायल युद्ध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेच्या दबावाला न जुमानता स्वतःची भूमिका ठामपणे मांडली आहे. “आम्ही कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका इराण सरकारने मांडली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची निर्णयक्षमता आणि स्वाभिमान अधोरेखित झाला आहे.
दुर्दैवाने, भारताने पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावा दरम्यान बोटचेपी भूमिका घेतली. यात भारताने ऐतिहासिक संधी गमावली. भारताच्या हाती पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची संधी होती. मात्र, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्तक्षेपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली झुकून ती संधी वाया घालवली.
आज त्याच ट्रंप यांनी पाकिस्तानला आपला “सर्वात चांगला मित्र” घोषित केले असून, पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना अमेरिकेत खास दावत देण्यात आली आहे. अमेरिका-पाकिस्तान संबंध नव्याने मजबूत होताना दिसत आहेत, जे भारताच्या रणनीतिक दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतात, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक विश्लेषक आणि राजकीय जाणकार पंतप्रधान मोदींच्या त्या काळातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. देशहिताच्या दृष्टीने ती योग्य ठरली का, यावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे.