मुंबई: विक्रोळी येथील ६६ कोटी रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी उभारलेला उड्डाणपूल आता वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. यामुळे करत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
टागोर नगर आणि एलबीएस मार्गाला जोडणारा हा उड्डाणपूल वाहतूक सुरळीत करण्याऐवजी स्वतःच एक अडथळा बनल्याने दररोजच्या वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने स्थानिक संतप्त झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे विक्रोळी तालुका अध्यक्ष अजय खरात यांनी या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
“६६ कोटी रुपये खर्च करून तयार झालेला पूल अवघ्या सात वर्षांतच समस्यांचे कारण बनतो, हे धक्कादायक आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने तपासणी करणे आवश्यक आहे,” असे खरात म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने स्थानिक प्रशासनाकडे या उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत असलेल्या डिझाइनमधील त्रुटी किंवा इतर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ब्रिजला डिव्हाईडर टाकण्याची आणि आरटीओ बीट नेमण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी बनवण्यात येणाऱ्या स्तंभाला अशोक स्तंभ असे नाव देण्याचीही मागणी केली आहे.