खोपोली : वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात शाखा स्थापनेचा झंजावात सुरू आहे. खोपोली शहरातील सम्राट अशोक नगर आणि वासरंग परिसरात शाखांचे नामफलक अनावरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड म्हणाले की, “गाव तिथे शाखा हे धोरण राबवत आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटना मजबूत करत आहोत. हा उपक्रम निवडणूकपुरता मर्यादित नसून, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.” आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढणार आहे. शहराध्यक्ष सुमित जाधव यांनी यावेळी सांगितले की, “आगामी नगरपरिषद निवडणुकीत जास्तीत जास्त शाखा स्थापन करून पक्ष अधिक बळकट करू.
अधिक ताकतीने निवडणूक लढविणार आहोत.” महासचिव धर्मेंद्र मोरे यांनी तरुणांना आवाहन करत सांगितले की, “प्रस्थापित पक्षांच्या फसव्या आश्वासनांना बळी न पडता, तरुणांनी आपल्या भविष्याचा विचार करून वंचित बहुजन आघाडीत सामील व्हावे.” नवनिर्वाचित शाखाध्यक्ष अनुज राजगुरु यांनीही पक्षाविषयी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकर वगळता तरुणांसाठी उपयोगी ठरतील असे कोणीही नेते उरलेले नाहीत.”
कार्यक्रमात महासचिव आशीष मणेर, कोषाध्यक्ष कुणाल पवार, संघटक संतोष मर्चंडे, उपाध्यक्ष अखिल शेख, ज्योती खाडे, प्रशाली मोरे, अमीना शेख, राहुल चव्हाण, शशिकांत कळवेकर, नयन गायकवाड, बंटी साळवी, राजेश गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. खोपोलीतून सुरू झालेली ही शाखा स्थापनेची चळवळ लवकरच संपूर्ण रायगड जिल्ह्यात पोहोचेल आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव अधिक व्यापक होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.