Asian Games 2026, India into Semifinal : आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी देत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने जपानचा अवघ्या ५७ धावांत डाव गुंडाळला आणि त्यानंतर केवळ ५ षटकांत २ विकेट्स गमावत ५९ धावा करून ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून भारताने जपानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारतीय गोलंदाजांनी या निर्णयाला पूर्णपणे योग्य ठरवत जपानच्या फलंदाजीची वाताहत केली. जपानचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत अवघ्या ५७ धावांवर सर्वबाद झाला. जपानकडून आयाका काटो-स्टाफोर्डने सर्वाधिक २५ धावा केल्या, तर
हरुनाने १० धावांची खेळी केली, पण बाकी कोणीही श्री चरणी आणि इतर भारतीय गोलंदाजीसमोर खास काही करू शकले नाही. दोन फलंदाज तर धावबाद झाले.
भारताकडून श्री चरणीने भेदक गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या. तिच्या प्रभावी गोलंदाजीला शफाली वर्माने २ विकेट्स घेत साथ दिली. श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. जपानचे दोन फलंदाज धावबादही झाले.
५८ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. शफाली वर्माने पहिल्याच षटकात चार चौकार ठोकत १७ धावा केल्या. मात्र भारताला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. गुनालन कमलिनीला नोनोहा यासूमोटोने शून्यावर बाद केले. त्यानंतर भारती फुलमालीही ६ धावांवर बाद झाली.
दोन विकेट्स गमावल्यानंतर शफाली वर्माने रिचा घोषच्या साथीने डाव सावरला आणि भारताला अवघ्या ३० चेंडूंत विजय मिळवून दिला. शफालीने केवळ १५ चेंडूंत नाबाद ४० धावा ठोकल्या. तिच्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. रिचा घोषने ६ चेंडूंत नाबाद १२ धावा केल्या.
अखेर भारताने ५ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात ५९ धावा करत सामना आपल्या नावावर केला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेटमधील पदकाच्या शर्यतीत प्रवेश केला. या विजयासह भारतीय महिला संघाने स्पर्धेतील पदक निश्चित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पुढे २० सप्टेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीतील निकाल काहीही असला, तरी भारताचा पदकासाठीचा सामना २२ सप्टेंबरला होणार आहे. उपांत्य फेरीतील विजेता संघ सुवर्णपदकासाठी, तर पराभूत संघ कांस्यपदकासाठी मैदानात उतरणार आहे.






