पुणे : भटके-विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट ‘भटके-विमुक्त दिना’निमित्त पुण्यात भटके-विमुक्त राज्यस्तरीय परिषद २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती आहे. यावेळी भटक्या-विमुक्त समाजबांधवांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांना संविधानाच्या प्रस्तावनेची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.
पुण्यातील सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारक सभागृहापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भटके-विमुक्त समाजातील पारंपरिक लोककलावंतांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. पारंपरिक वाद्ये, नृत्य आणि संगीताच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली.
यानंतर साने गुरुजी स्मारक सभागृहात राज्यस्तरीय परिषदेची सुरुवात झाली. भटके-विमुक्त समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून समाजबांधव मोठ्या संख्येने परिषदेसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने परिषदस्थळी गर्दीचे चित्र पाहायला मिळत असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






