मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भाजप-आरएसएस यांच्यातील अलीकडच्या राजकीय जवळिकीवरून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी पुरोगामी आणि स्त्रीवादी विचारसरणीच्या समर्थकांवर जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत राजकीय भूमिकांमधील कथित दुटप्पीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना उघडपणे पाठिंबा देणाऱ्या काही स्त्रीवादी आणि पुरोगामी मंडळींनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भाजप-आरएसएस यांच्यात झालेल्या राजकीय सोयरिकीवर मौन का बाळगले, असा सवाल अंजली आंबेडकर यांनी केला आहे.
‘वंचितला बी-टीम म्हणणारे आता गप्प का?’
आपल्या पोस्टमध्ये अंजलीताई आंबेडकर यांनी म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी काही पुरोगामी मंडळी मित्रांना खुली पत्रे लिहितात, बदनामीकारक पोस्ट करतात आणि केवळ वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली म्हणून तिला भाजपची ‘बी-टीम’ ठरवण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठका घेतल्या जातात. याबाबत वृत्त लोकसत्तेत प्रसिद्ध झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे.
मात्र, आरएसएस आणि पवार राजकीयदृष्ट्या एकत्र येतात आणि दोन राजकीय घराण्यांमधील वैवाहिक नात्यामुळे ही राजकीय सोयरिक अधिक घट्ट होते, तेव्हा मात्र संबंधितांच्या लेखण्या अचानक थांबतात, अशी टीका त्यांनी केली.
ना खुले पत्र, ना पोस्ट, ना राजकीय विश्लेषण, ना साधा एक शब्द. का? असा थेट प्रश्न अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. या मौनाचे कारण त्यांच्या मते राजकीय नैतिकतेचे जातीनुसार वेगवेगळे निकष असू शकतात, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवते तेव्हा तिला भाजपची ‘बी-टीम’ ठरवले जाते. मात्र, स्वतःच्या पसंतीच्या राजकीय पक्षाची भाजप-आरएसएससोबत सोयरिक होते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप त्यांनी केला आहे.
अंजलीताई आंबेडकर यांनी स्त्रीवादी विचारसरणीतील ‘Personal is Political’ या घोषणेचा संदर्भ देत कौटुंबिक नात्यांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या राजकीय समीकरणांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल उपस्थित केला आहे. “हा भाबडेपणा का जातीयवाद?” असा प्रश्नही त्यांनी आपल्या पोस्टमधून विचारला आहे.
हा प्रश्न आता केवळ दुटप्पीपणापुरता मर्यादित राहिलेला नाही. वारंवार दिसून येणारा हा पॅटर्न गंभीर प्रश्न निर्माण करतो. संबंधितांची राजकीय भूमिका खरोखरच विचारधारेवर आधारित आहे की जातीय समीकरणांवर, याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजकीय भूमिका एखाद्या व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या कृतीवर न ठरता त्याच्या जातीवर ठरवली जात असेल, तर अशा भूमिकेला ‘पुरोगामित्व’ कसे म्हणायचे, असा सवाल अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.






