सोलापूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूर शहरातील मडकी वस्ती येथे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाजबांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील नागरिक आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी इस्लाममधील ‘मसावत’ म्हणजेच समता या संकल्पनेवर विचार मांडले. आंबेडकरवादी आणि मुस्लिम समाजाने एकत्र येणे हा मसावत अर्थात समतेचा संगम असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरात मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या सन्मानाला धक्का पोहोचविणाऱ्या घटना घडत असल्याचा आरोप करत, भाजप-आरएसएसच्या सरकारकडून मुस्लिम समाजाला जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचेत्यांनी सांगितले.
Also Read : SC, ST, OBC समाजाची प्रगती जातीयवादी मानसिकतेला पचत नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर
ईद आणि भीम जयंतीसारखे सण रस्त्यावर सन्मानाने साजरे करता येतात, यामागे पूर्वजांनी केलेला राजकीय संघर्ष महत्त्वाचा आहे, असेही सुजात आंबेडकर यांनी नमूद केले. सणाच्या दिवशीही आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, मुस्लिम समाजातील तरुणांना मॉब लिंचिंगसारख्या घटनांना सामोरे जावे लागत असून, कोणतीही घटना घडली तरी पोलिसांकडून प्रथम मुस्लिमांच्या घरांवर कारवाई केली जाते आणि तरुणांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जाते, असा आरोपही त्यांनी केला. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मॉडेल बॉईजमधील मुस्लिम तरुणांनी केले होते. कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील मोठ्या संख्येने तरुण तसेच वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






