मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही महिन्यांतच उखडून गायब झाले आहेत. मात्र, हे स्पीड ब्रेकर बसविण्यासाठी वापरण्यात आलेले तीक्ष्ण लोखंडी खिळे आणि बोल्ट सध्या रस्त्यावर उघडे पडले असून, त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येची तातडीने दखल घेण्यात यावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने रस्त्यावर उघडे पडलेले धोकादायक खिळे व बोल्ट त्वरित हटवावेत आणि त्याठिकाणी दर्जेदार नवीन स्पीड ब्रेकर बसवावेत. अन्यथा मनमाड नगरपालिकेच्या पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास आहीरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यावर उघडे पडलेले लोखंडी खिळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे वाहने घसरून किंवा खिळ्यांवर आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर होण्याबरोबरच फाटण्याच्या घटनांमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पाणी साचणे तसेच रात्रीच्या वेळी अंधार असणे यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. अशा परिस्थितीत पादचाऱ्यांचा पाय उघड्या खिळ्यांवर पडून गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून उघडे पडलेले सर्व खिळे व बोल्ट तात्काळ काढावेत आणि संबंधित ठिकाणी चांगल्या दर्जाचे नवीन स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, अमोल केदारे, अशपाक शाह, खुशाल थोरात, रूपेश जाधव, सागर गाडे, सुनील बागुल यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.





