मांडेगाव : द बौद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) व समता सैनिक दल संचलित मांडेगाव येथील ‘जय भीम बुद्ध विहार’ इमारतीचे छत दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी अचानक खाली कोसळल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या विहारात दररोज सायंकाळी लहान मुलांचे शालेय शिक्षण तसेच संस्कार वर्ग घेतले जातात. दुर्घटना घडली त्या क्षणी सुदैवाने मुले तेथे नसल्याने मोठा अनर्थ टळला; अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत मांडेगाव बौद्ध बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल (संस्थापक बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर) यांच्या मार्गदर्शनाखाली मांडेगाव येथे बुद्ध विहाराचे कार्य चालते. मागील काही वर्षांपासून येथील बौद्ध बांधवांनी एका सभागृहाचे विहारात रूपांतर करून तेथे बुद्ध रूप व विहाराचे स्वरूप दिले आहे. सध्या दि. २९ जुलै २०२६ पासून वर्षावासानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. भारतीय बौद्ध महासभा तालुका संस्कार विभाग प्रमुख ज्ञानदेव सोनवणे गुरुजी यांच्या उपस्थितीत हे उपक्रम सुरू आहेत. गुरुजी विहारात उपस्थित असतानाच ही छत कोसळल्याची घटना घडली, ही मांडेगावसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Also Read : ईश्वरनगर, दिघा येथे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश
स्थानिक बुद्ध विहार कार्यकारिणी आणि ग्रामस्थांनी मांडेगाव ग्रामपंचायतीकडे वारंवार विहारासाठी अथवा ‘संविधान भवना’साठी जागेची मागणी केली आहे. याशिवाय दलित निधीतून विहाराच्या खिडक्या, रंगकाम आणि वॉटरप्रूफिंग दुरुस्तीची मागणी अनेक निवेदनांद्वारे करण्यात आली. परंतु, ग्रामपंचायतीने या सर्व मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करून त्यांना केराची टोपली दाखवली. स्थानिकांनी स्वतः वर्गणी जमा करून दुरुस्तीचे काम करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ते कामही करू दिले गेले नाही, असा गंभीर आरोप कार्यकारिणीने केला आहे.
“दररोज सायंकाळी लहान मुले या ठिकाणी अभ्यासासाठी आणि संस्कार वर्गासाठी येतात. छत खाली पडल्यामुळे जर लहान मुलांना दुखापत झाली असती किंवा एखादी जीवितहानी झाली असती, तर याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल जय भीम बुद्ध विहार कार्यकारिणीने केला आहे.
ग्रामपंचायतीच्या या बेजबाबदार कारभाराचा जाहीर निषेध नोंदवत येत्या १५ ऑगस्ट रोजी (स्वातंत्र्यदिनी) मांडेगाव ग्रामपंचायतीला निवेदन देऊन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या आंदोलनादरम्यान पूर्वजांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे.
Also Read : मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst !
हा जाहीर निषेध व आंदोलनाचा इशारा जय भीम बुद्ध विहार कार्यकारिणीचे अध्यक्ष रामभाऊ सोनवणे, सरचिटणीस कैलास सोनवणे, कोषाध्यक्ष राजेंद्र हिरालाल खुरंगळे, कार्यालय सचिव अमृतानंद ज्ञानदेव सोनवणे, हिशोब तपासणीस रणजीत लक्ष्मण सोनवणे तसेच रत्नदीप ग्रुपच्या सर्व सदस्यांनी व बौद्ध समाजाने दिला आहे.





