मिरज (जि. सांगली) : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिरज येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व नाट्य मंदिर येथे हा मेळावा पार पडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते सोमनाथ साळुंखे, पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सुजात आंबेडकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
“गेल्या पाच वर्षांत विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे,” असे सांगत सुजात आंबेडकर यांनी पक्षाच्या आंदोलनात्मक भूमिकेवर प्रकाश टाकला.
ते म्हणाले की, अतिक्रमणाच्या गाड्या वाचवण्यापासून ते अदानीचे मीटर जबरदस्तीने लावण्याच्या विरोधापर्यंत वंचित बहुजन आघाडी सातत्याने जनतेच्या प्रश्नांसाठी उभी राहिली आहे. पोलिस स्टेशन अथवा न्यायालयीन प्रकरणांमध्येही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीसाठी धावून येतात, असे त्यांनी नमूद केले.
गायरान जमिनीच्या प्रश्नावरही वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर आंदोलन उभे केले. “जमीन सरकारी है, वो जमीन हमारी है” ही भूमिका घेत गायरान जमिनींच्या हक्कासाठी पक्षाने संघर्ष केला असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.
तसेच, बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा आणि त्यासाठी BT Act रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन करणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला.
आगामी काळातही जनतेच्या विविध प्रश्नांवर संघर्षाची भूमिका कायम ठेवून संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले. पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता संवादामुळे मिरज परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.






