वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे यांचे जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
मनमाड : मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग मनमाड नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास अशोक आहिरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी नाशिक तसेच मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या मनमाड उपजिल्हा रुग्णालयामार्फत विवाह नोंदणीचे कामकाज पाहिले जात आहे. मात्र, रुग्णालयात रुग्णसेवा, आपत्कालीन वैद्यकीय उपचार आणि प्रशासकीय कामांचा मोठा ताण असल्याने विवाह नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ मधील तरतुदींनुसार शहरी भागातील विवाह नोंदणीचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असणे अधिक सोयीचे आणि प्रशासकीयदृष्ट्या सुलभ ठरते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे की, उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग पूर्णपणे मनमाड नगर परिषदेच्या प्रशासकीय कक्षेत वर्ग करण्यात यावा. तसेच नगरपालिकेत स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी आणि स्वतंत्र कक्ष सुरू करून नागरिकांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र सहज उपलब्ध करून द्यावे.
नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आरोग्य विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधून हा विभाग तातडीने मनमाड नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विलास आहिरे यांनी केली आहे.






