मुंबई : वरळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दर्जेदार जेवण व इतर मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश अशोक दोडके यांनी वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी आकाश दोडके यांनी थेट वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात जाऊन विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेची पाहणी केली. तसेच जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तपासणी करून संबंधित ठेकेदाराला विद्यार्थ्यांना सकस, पौष्टिक, दर्जेदार आणि पोटभर जेवण देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
यानंतर त्यांनी वसतिगृहाचे अधीक्षक यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आकाश दोडके म्हणाले की, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात कोणत्याही प्रकारच्या गैरसोयी सहन कराव्या लागू नयेत. त्यांच्या राहण्यापासून ते जेवणापर्यंत प्रत्येक सुविधेचा दर्जा कायम राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांबाबत कोणतीही हयगय वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य लढ्यात वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.” या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनीही आपल्या विविध अडचणी मांडल्या असून त्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.






