कळमनुरी : आखाडा बाळापूर बसस्थानक परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) कलमनुरी/हिंगोली आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले.
बसस्थानकात बसेस प्लॅटफॉर्मला लावाव्यात, पावसामुळे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करून मुरूम-गिट्टी टाकण्यात यावी तसेच आखाडा बाळापूर–बौर–येडशी–भोसी–वारंगा मार्गे नियमित बससेवा सुरू करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, आखाडा बाळापूर हे परिसरातील प्रमुख व वर्दळीचे बसस्थानक असून येथून दररोज हजारो प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी प्रवास करतात. मात्र अनेक बसचालक बसेस प्लॅटफॉर्मवर न लावता बसस्थानकाच्या मध्यभागी किंवा बाहेरील ठिकाणी उभ्या करत असल्याने प्रवाशांना धावत जाऊन बस पकडावी लागत आहे.
तसेच पावसाळ्यात बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून योग्य खडीकरण नसल्यामुळे सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना चालणे कठीण होत असून घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, आखाडा बाळापूर–बौर–येडशी–भोसी–वारंगा या मार्गावर नियमित एसटी बससेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची वाहतुकीची गैरसोय दूर होईल, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पावसाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बसस्थानक परिसरात तातडीने मुरूम व गिट्टी टाकून रस्ता समतल करावा, साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि सर्व बसेस प्लॅटफॉर्मवरच उभ्या करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका महासचिव प्रियानंद घोडगे, तालुका उपाध्यक्ष यशवंत नरवाडे, सुभाष खाडे, सचिव मुकिंदा ढेपे, संतोष इंगोले, अमोल खंदारे, सोनाजी काळे आणि निखिल खाडे उपस्थित होते.






