– संजीव चांदोरकर
मणिपाल हॉस्पिटल्स अयापियो निमित्ताने
हा आयपीओ पाच पट over subscribe होऊन काल बंद झाला. त्या निमित्ताने हॉस्पिटल्स (आणि एकूणच आरोग्य) क्षेत्रात घडणारे कॉर्पोरेटीकरण , वित्तीयीकरण आणि परकीयीकरण समजून घेऊया !
या काही दूरवर अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवर घडणाऱ्या घटना/ प्रक्रिया नाहीत. त्या तुमच्या आमच्या आणि विशेषतः कोट्यवधी गरीब निम्न मध्यमवर्गीयांच्या जीवन मरण प्रभावित करणाऱ्या प्रक्रिया आहेत.
फक्त काही वर्षापूर्वी मुख्यत्वे कर्नाटक मध्ये हॉस्पिटल्स असणारी ही कंपनी आता पॅन इंडिया हॉस्पिटल्स चेन बनली आहे. सध्या या हॉस्पिटल कंपनीची १४ राज्यात ४९ हॉस्पिटल्स आहेत. या ४९ हॉस्पिटल्स मध्ये मिळून त्यांच्याकडे १३,००० लायसेन्स बेड आहेत.
नॉर्मली आपल्याला असे वाटते की कंपन्या वस्तुमाल सेवांचे उत्पादन करून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून, आणि अधिकची कर्जे काढून आपला पसारा वाढवतात. त्याला ऑरगॅनिक ग्रोथ म्हणतात..(म्हणजे जसे झाड स्वतःचे अन्न स्वतः बनवून मोठे होते तसे) ते मॉडेल कालबाह्य झाले आहे. आता त्याच क्षेत्रातील अस्तित्वात असणाऱ्या कंपन्या टेक ओव्हर करत आकार झपाट्याने वाढवला जातो. त्याला इनऑरगॅनिक ग्रोथ म्हणतात. (म्हणजे जसे उद्या एखाद्या झाडाने आजूबाजूच्या झाडांना खाऊन स्वतःचा आकार वाढवला तसे काहीसे).
मणिपाल कंपनी ऑरगॅनिक वाढला. तिने गेल्या फक्त चार वर्षात देशातील अनेक हॉस्पिटल्स चेन टेक ओव्हर केल्या. उदा. कोलंबिया, विक्रम, AMRI, मेडिका, सह्याद्री इत्यादी.
हे एकत्रित व्यवहार काही हजार कोटींचे असतात. त्यासाठी भांडवल लागते. हे लागणारे अतिरिक्त भांडवल मणिपाल नफा रिसायकल करून करू शकतच नव्हती.
मणिपाल मध्ये सिंगापूर देशाच्या सरकारी फंड असणाऱ्या TEMASEK ने मोठे भागभांडवल पुरवले आहे. सध्या मणिपाल हॉस्पिटल्स कंपनीची अर्धी मालकी TEMASEK कडे आहे. म्हणजे तुम्ही कर्ज काढून मणिपाल मध्ये उपचार घ्याल तर त्याचा फायदा सिंगापूर मधील जनतेला होणार आहे. कारण Temasek सिंगापूर सरकारच्या मालकीचा फंड आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मणिपाल हॉस्पिटल्सने अयापियो आणला. एका शेयर साठी ५६० ते ५९० रुपयांची बोली लावली गेली होती. यातून कंपनी ९,२७५ कोटी रुपये उभे करणार आहे. त्यातील काही भाग वापरून मुंबई, बंगळूर, रायपूर येथे एकूण २,५०० नवीन बेड असणारी हॉस्पिटल्स उभी केली जाणार आहेत..
मार्च २०२६ मध्ये संपलेल्या वर्षात ५,२७,००० रुग्णांनी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होऊन उपचार घेतले. तर ओपीडी मध्ये ५५ लाख रुग्णांनी. यातून या कंपनीने १०,००० कोटींचे उत्पन्न मिळवले. प्रत्येक बेड मागे कंपनीचे सरासरी उत्पन्न ६९,००० रुपये होते.
(आकडेवारी काढता येईल. ज्या ज्या ठिकाणी खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल्सकडे रुग्णांची संख्या वाढली / वाढत आहे / त्या शहरात किंवा त्याच्या २०-२५ किलोमीटरच्या परिघात शासकीय हॉस्पिटल्सची सेवा मरण पंथाला लावली गेली असणार, यात काही खास ज्ञान नाही. कॉमन सॅन्सीकल आहे हे सारे)
ही सगळी माहिती, आकडेवारी कशासाठी जाणून घ्यायची तर भारतातील एकूणच आरोग्य सेवा क्षेत्राचे किती वेगाने कॉर्पोरेटिकरण, वित्तीयकरण आणि परकीयी करण होत आहे हे कळण्यासाठी.
लक्षात घ्या हा काही खाजगी वि सार्वजनिक कलगीतुरा नाही. ईथे कॉर्पोरेच्या वित्तीयीकरणाचे महत्व समजून घेतले पाहिजे.
कोणतीही हॉस्पिटल कंपनी शेयर मार्केट वर लिस्टेड झाल्यावर तिचे वर्गीय चरित्र अमुलाग्र बदलते. रुग्णांवर उपचार होतात पण उत्पन्न आणि नफा वाढवण्याचे उद्दिष्ट ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसते. रुग्णावरील उपचार मागच्या सीटवर ढकलले जातात.
रुग्णांना जास्त दिवस हॉस्पीटल मध्ये ठेवणे, सतत औषधे बदलणे, ती महागडी औषधे हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या दुकानातूनच घेण्याचे बंधन घालणे, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना महिना, वार्षिक टार्गेट देणे…. सर्वांना सर्व माहित आहे. कारण आपण स्वतः, नातेवाईक किंवा ओळखीचे यातून जात आहोत.
मणिपाल काही पहिली हॉस्पिटल चेन नाही की जी शेअर मार्केटवर लिस्टेड होत आहे. आपल्या देशात नारायणा, अपोलो, मॅक्स, फोर्टिस, मेदांत, KIMS, Aster अशा अनेक हॉस्पिटल्स चेन शेयर मार्केट वर लिस्टेड आहेत. .यात मोठ्या प्रमाणावर भारतातील आणि जगातील भांडवल बाजारातील कॉर्पोरेट / वित्त भांडवल येत आहे.
त्या सर्वांचे मिळून वार्षिक उत्पन्न ८०,००० कोटी रुपये आहे आणि नफा काही १०,००० कोटी रुपये. ते आकडे दरसाल दार शेकडा २५ टक्क्यांनी वाढत आहेत.
लक्षात घ्या यात खोके पेट्या नाही. खोके पेट्यांच्या पलीकडे राजकीय अर्थव्यवस्था आकार घेत आहे.
आपल्याला खोके पेट्या, राजकीय नेते यातच गुंतवून ठेवले जातं नाहीये ना ? खरा गेम तर दुसरीकडे सुरू आहे ? या गेम मुळे आपले आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे गळे आवळले जाणार आहेत. माहिती घेणे, भूमिका घेणे आज ऑप्शनल आहे. उद्या नसेल.






