मुंबई : राज्यात अन्नभेसळ आणि अमली पदार्थांविरोधातील कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवरही कठोर पावले उचलली आहेत. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नियमभंग करणाऱ्या ३८ संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ३४ रक्तपेढ्या व रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, चार संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत एफडीएने राज्यभरातील रक्तपेढ्यांची सखोल तपासणी केली. त्यावेळी अनेक केंद्रांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
सध्या महाराष्ट्रात ४१३ परवानाधारक रक्तपेढ्या आणि ४६८ रक्त साठवणूक केंद्रे कार्यरत आहेत. तपासणीदरम्यान २१ रक्तपेढ्या आणि १३ रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. तसेच दोन रक्तपेढ्या आणि दोन रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. यावेळी एफडीएच्या तपासणी दरम्यान परवान्याच्या अटींचे उल्लंघन, गुणवत्ता व्यवस्थापनातील त्रुटी, नोंदींमधील विसंगती, रक्त साठवणुकीसाठी आवश्यक तापमान नियंत्रणाचा अभाव, रक्त तपासणीतील नियमांचे पालन न करणे तसेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आढळून आल्या. अशा अनेक त्रुटी हे तपासणी दरम्यान आढळून आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, सांगली, सातारा, अमरावती, वाशिम आदी जिल्ह्यांतील अनेक रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. तसेच यावेळी पुण्यातील बोरी परढी येथील पाटील हॉस्पिटल रक्त साठवणूक केंद्र आणि भिवंडीतील आधार रक्त साठवणूक केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. तक्रारीनंतर झालेल्या तपासणीत माया ब्लड सेंटर आणि सर जे. जे. महानगर ब्लड सेंटरवरही कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, रक्त हे केवळ औषध नसून जीवन वाचवणारे साधन आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रक्त पुरवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही रक्त केंद्राला किंवा रक्त साठवणूक केंद्राला सोडले जाणार नाही. भविष्यातही नियमित आणि अचानक तपासण्या सुरू ठेवून सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित केले जाईल.




