ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात बांधकामासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर टीका करत या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे.
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे काय सुरू आहे? मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे येथे बांधण्यात येत असलेला हा पूलही वाहून गेला. राज्यात, केंद्रात आणि ठाण्यात भाजपची सत्ता आहे. असा सवाल करण्यात आला आहे. (Thane Bridge Collapse)
Also Read : हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार!
तसेच, आता यावर काही बोलले तर नागरिक महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे म्हणणार का? पण तुमच्या सरकारने दिलेल्या कंत्राटांमुळे पूल कोसळतात, रस्त्यांवर खड्डे पडतात, दरडी कोसळतात; त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
खाडीवरील मुख्य पूल उभारण्याचे काम सुरू असल्याने यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य तसेच कामगार आणि अधिकाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी स्वतंत्र तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. सुदैवाने घटना घडली त्यावेळी पुलावर कोणतेही कर्मचारी किंवा वाहने नसल्याने मोठी जीवितहानी टळली. (Thane Bridge Collapse)





