तिवसा : शेतीच्या पेरणीचा हंगाम आटोपला असताना शेतकऱ्यांनी विविध कंपनीचे पेरलेले बियाणे काही ठिकाणी उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या असून निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे केली आहे.
पेरणीनंतर काही शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वंचित बहुजन आघाडीकडे प्राप्त झाल्या होत्या, शेतकरी कायम अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला असताना बियाणे कंपनीने निकृष्ट बियाणे देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. सदर प्रकारामुळे अल्पभूधारक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहे. सदर बाबीची दखल घेत नीकृष्ठ बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुक्याच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, राहूल पखाले, दिनेश कांबळे, अमर कांबळे, अभिषेक मनोहरे, प्रतीक कठाने सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नाही त्याकरिता कृषी सेवा केंद्र जबाबदार असून पूर्णपेरणी करिता कृषी सेवा केंद्राने बियाणे उपलब्ध करून द्यावे व संबंधित कंपनी विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करावा, आमच्या निवेदनाची दखल घेत यासंदर्भात तहसीलदार यांचेकडे 14 जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे. बैठकीत शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्र विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी दिली आहे.





