अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील ड्रेनेजच्या कामानंतर तातडीने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे तसेच शहराला दर चार दिवसांनी नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या अक्कलकोट शहर व तालुका शाखेच्या वतीने अक्कलकोट नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. मागण्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
अक्कलकोट शहरात सध्या ड्रेनेजच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाइपलाइन टाकून महिनाभराहून अधिक कालावधी उलटूनही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात धुळीचा समस्या निर्माण झाले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार, दमा, सायनस यांसारख्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये येत असतात. अशा परिस्थितीत ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे आवश्यक असताना नगरपरिषद या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
याशिवाय शहरातील पाणीटंचाईचाही प्रश्न गंभीर असून नागरिकांना १५ ते २० दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. हा पाणीपुरवठा दर चार दिवसांनी नियमित करण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे अर्धनग्न आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे, तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, युवक शहराध्यक्ष संदीप बाळ शंकर, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले, तालुका उपाध्यक्ष यशवंत शेठ इंगळे, तालुका महासचिव नागेश हरवाळकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





